इंफाळ -देशाच्या विविध भागांतून आणि परदेशांतून मणिपूरमध्ये परतणाऱ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, त्या प्रक्रियेचे पालन न करणाऱ्यांना अटक करून तुरूंगात धाडले जाईल, असा सज्जड इशारा मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी दिला आहे.
मणिपूरमध्ये एप्रिल महिन्यात करोनाबाधितांची संख्या केवळ 2 होती. ते दोन्ही रूग्ण पूर्ण बरे झाले. त्यामुळे सिंह यांनी 19 एप्रिलला मणिपूर करोनामुक्त झाल्याचे जाहीर केले. मात्र, चालू महिन्यात त्या राज्यात नव्याने करोनाबाधित आढळले. आता तेथील संख्या 27 वर पोहचली आहे.
देशाच्या विविध भागांतून घरवापसी करणाऱ्यांचा प्रामुख्याने त्या बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे घरवापसी करणाऱ्यांसाठी विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्यासंबंधीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सूतोवाच सिंह यांनी केले. क्वारंटाईनच्या आदेशाचा भंग हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. करोनाचा सामूहिक संसर्ग टाळण्याला आमचे प्राधान्य आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.