नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येचा आरोप असलेला दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला या प्रकरणातून क्लीन चिट मिळवून देण्याचे तसेच त्याला यातून वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सुशील कुमारला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आल्याचे मत त्याचे वकील बी. एस. जाखड यांनी व्यक्त केल्याने आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
देशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी सुशीलविरोधात षडयंत्र रचण्यात आले. त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले, असा दावाही जाखड यांनी केला आहे. एफआयआरमध्ये पहिल्यांदा सुशीलच्या नावाचा उल्लेखही नव्हता. या प्रकरणात सागर धनखडचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी एक मल्ल होता असा उल्लेख केला होता.
मात्र, तो सुशील कुमार असल्याचे म्हटले नव्हते. छत्रसाल स्टेडियममध्ये दोन गटांमध्ये मारामारी सुरू असताना सुशील हे भांडण सोडवण्याचा आणि याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता, असे विधान जाखड यांनी केले असून, यातूनच सुशील कुमारला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
हाणामारीदरम्यान धनखडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सुशील फरार झाला होता. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी इतिहासात पहिल्यांदाच 10 दिवसांनंतर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. नियोजित पद्धतीने सुशीलविरुद्ध कारस्थान रचण्यात आले. पोलिसांनी सुशीलऐवजी त्याच्या पत्नीला नोटीस का पाठवली.
आरोपपत्र दाखल केल्यानंतरच आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात येते. पण सुशीलच्या बाबतीत आरोपपत्र दाखल करण्याआधीच बक्षीस का जाहीर करण्यात आले, असा सवालही जाखड यांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी कोऱ्या कागदावर सुशीलकडून त्याची स्वाक्षरी घेतली आहे. सुशील सध्या पोलीस कोठडीत असल्याने पोलीस त्याने न केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून करवून घेत आहेत. सुशीलने कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्यास इन्कार केला आहे. पोलिसांकडे आता आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवस आहेत. या घटनेचे चित्रीकरणही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही पुढील सुनावणीची प्रतीक्षा करत आहोत, असेही जाखड यांनी नमूद केले.