पुणे (अविनाश ढगे) –रोजच्या जगण्यासह आता शिक्षणही महागाईच्या कचाट्यात सापडले आहे. शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच बाजारातील शैक्षणिक साहित्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 45 ते 50 टक्के वाढले आहेत. विशेषत: वह्या, गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्यांच्यादरात अव्वाच्या सव्वा वाढ झाल्याने मुलांना शिकवायचे कसे? अशी विवंचना मध्यमवर्गीय पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
करोना संकटानंतर तब्बल तीन वर्षांनी यंदा शाळा पूर्ण वेळ सुरू होत आहेत. त्यामुळे मुलांसाठी पुस्तके, वह्या, दप्तर खरेदीसाठी पालकांची तयारी सुरू आहे. शैक्षणिक साहित्याचे वाढलेले दर पाहून पालकांची झोप उडाली आहे. गेल्या दोन वर्षांत शाळा ऑनलाइन होत्या. त्यामुळे मुलांना घरीच जुन्या वह्या तसेच इतर साहित्य वापरता येत होते. तर शाळेच्या गणवेशाचे बंधन नव्हते. तसेच शाळा ऑफलाइन असल्याने दप्तर, बूट, रेनकोट तसेच इतर प्रकल्प तसेच अभ्यासाच्या साहित्याचे कोणतेही बंधन नव्हते. मात्र, आता शाळा सुरू होणार असल्याने शाळांनी निकालासोबतच पुढील शैक्षणिक वर्षांच्या साहित्यची यादी पालकांच्या हातात टेकवली आहे. या खरेदीसाठी बाजारात पोहचल्यानंतर वस्तूंच्या किंमती ऐकून पालकांचे डोळे गरगरण्याची वेळ आली आहे.
महागाईचे कारण…
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कागदांच्या किमती जवळपास दुपाटीने वाढल्या आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढतच असल्याने या साहित्याचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे वह्या आणि पुस्तकांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
वह्यांच्या किमतीत मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35 टक्के वाढ झाली आहे. मागच्या वर्षी अ-4 वही 32 रुपयांना होती. ती आता 40 रुपयांना आहे. तर काही प्रमुख कंपन्यांच्या वह्या 550 रुपये डझन होत्या. त्या आता 700 रुपयांना आहेत. अशीच स्थिती पुस्तकांची असून खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांच्या किंमतीत सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. स्टेशनरीच्या किंमतीत देखील 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे पेन, पेन्सिलसह इतर साहित्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. तर बुटांच्या किंमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे.
कागदाच्या किंमतीत जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे वही आणि पुस्तकांच्या किंमतीत 30 ते 35 टक्के वाढ झाली आहे. तसेच स्टेशनरीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
– निखिल घोडके, गणराज बुक सेंटर
मागच्या दोन वर्षांपासून शाळाच बंद होत्या. त्यामुळे पालकांनी यापूर्वी तीन वर्षांपूर्वी शाळेचे युनिफॉर्म खरेदी केले होते. यंदा कापडाच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे युनिफॉर्मच्या किंमतींचा मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत विचार केल्यास 35 ते 45 टक्के वाढ झाली आहे.
– मिलिंद शालगर, कापड विक्रेते
बॅगेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे स्कूल बॅगच्या किंमती वाढल्या आहेत. मागची दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. यावर्षी शाळा जरी सुरू होणार असल्या, तरी महागाईमुळे सर्वच त्रस्त आहेत.
– श्री राजिवडेकर,
बॅग विक्रेते
चप्पल आणि बुटांवर (क्लोथ) पूर्वी 5 टक्के जीएसटी होता. आता तो 12 टक्के झाला आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती वाढल्या आहेत.
– राजेंद्र कांबळे, मोहन शुज
काल मुलांच्या शाळेसाठी साहित्य खरेदी करायला गेलो होतो. किंमती ऐकताच थबकलो. मुलांचे शिक्षण दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. येथून पुढे मुलांना शिकवायचे कसे? हा प्रश्न आमच्या समोर पडला आहे.
– रामदास घाटे, पालक तथा रिक्षाचालक
आम्ही वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी आलो असता, महागाई पाहून माघारी परतण्याची वेळ आली आहे. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरी बसवण्याची वेळ आली आहे.
– जयंत कापसे, पालक तथा भाजी विक्रेते