चेन्नई – सुशिक्षित महिला अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहेत. विविध क्षेत्रात नेतृत्व देत असून समाजावर सकारात्मक प्रभाव पडत आहे. सध्या मद्रास विद्यापीठ आणि त्याच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे 1.85 लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक मुली आहेत, ही भूषणावह गोष्ट आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
मद्रास विद्यापीठाच्या 165 व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. त्यापूर्वी राजभवनात त्यांना “गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. दीक्षांत समारंभात सहभागी होऊन द्रौपदी मुर्मू यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुर्मू म्हणाल्या की, मद्रास विद्यापीठ स्त्री-पुरुष समानतेचे ज्वलंत उदाहरण आहे. मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करून आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी गुंतवणूक करत आहोत. चेन्नई हे सभ्यता आणि संस्कृतीचे माहेरघर आहे. येथील थिरुक्कुरल कविता अनेक शतकांपासून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे.
भक्ती कवितेची महान परंपरा तामिळनाडूमध्ये उगम पावली आणि देशाच्या उत्तरेकडील भागात प्रवास करणाऱ्या संतांनी ती वाहून नेली. तामिळनाडूच्या मंदिरांची वास्तुकला आणि शिल्पे मानवी उत्कृष्टतेचे प्रतिबिंबित करतात. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पदवीधर विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदव्या आणि विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली.