शेवगाव – पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्याला जोडणाऱ्या त्याबरोबर मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शेवगाव शहरातील रस्ते सध्या वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी वैतागले असून तासन्तास कोंडी सुटत नसल्याने वाहनांचा लांबच लांब रांगा लागतात. या नित्याचा झालेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. या वाहतूकी कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी पर्याय असलेला बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भीजत पडला असून तो सोडविण्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष होत आहे.
मुंबई, पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत जवळचा आणि आर्थिक दृष्ट्या किफाईतशीर ठरणारा असल्याने बहुतेकजण शॉर्टकट म्हणून या मार्गाचा वापर करतात. तसेच जालना, अंबड, औरंगाबाद, शेंद्रे पंचतारांकित एमआयडीसीमधून मुंबई पुणेकडे जाणारी जड वाहतूकीसाठी देखील सोयीस्कर म्हणून याच मार्गाचा उपयोग होत असल्याने तसेच शेवगाव जवळ असलेल्या ज्ञानेश्वर, केदारेश्वर, वृद्धेश्वर व गंगामाई हे साखर कारखाने आणि परिसरात असलेल्या अनेक जिनिंग प्रेसिंग व तेल गिरण्यामुळे येथे असंख्य वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे शेवगावातून जाणाऱ्या नाशिक, परळ, औरंगाबाद, बारामती, घोटी, बीड आदी राज्य मार्गावर वरचेवर वाहतूक कोंडी होत असते. एखाद्या वाहनाच्या किरकोळ खोळंब्यामुळे त्या मागील समोरील आणि बाजूची सर्व वाहतूक ठप्प होते. सर्व बाजूच्या रस्त्यावर शेकडो वाहनाच्या रांगा लागतात. किमान एक दीड तास ती सुरळीत होत नाही. हे आता नित्याचे झाले आहे.
यावर बाह्यवळणचा पर्याय आहे.मात्र निवडणूक आली की सर्वजण तो विषय गांभीर्याने आपल्या अजेठ्यावर घेण्यापलीकडे त्यांची धाव जात नाही. त्याचा पाठपुरावा निवडणूक संपल्यानंतर होत नाही, असा अनुभव आहे. या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीपेक्षाही शेवगाव शहरातील बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ता अत्यंत आवश्यक अरुंद असून दोन्ही बाजूचे व्यावसायिक आपल्या मालाचे बाहेरील बाजूस टेबल, रॅक मांडून प्रदर्शन करीत थेट रस्त्यावर येतात. येणारा ग्राहक त्याच्यापुढे आपली दुचाकी उभी करून दुकानात जातो.
दोन्ही बाजूचे व्यावसायिक व ग्राहक ही अशाच पद्धतीने व्यवहार करत असल्याने या रस्त्यावर पादचाऱ्यासाठी जागाच शिल्लक रहात नाही. त्यातून धडधाकट माणसालाही चालणे मुश्कील होते. शाळकरी मुले, महिला, वृद्धांना तर या मार्गावरून नीट चालताच येत नाही. अशावेळी मोकाट जनावरांचा घोळका, डुकरांची पिलावळमध्ये घुसली तर अपघात झाल्याशिवाय रहात नाही. त्याकरता व्यवसायिकांनी प्रदर्शन टाळावे, ग्राहकांनी वाहने पेठेत नेऊ, किमान एवढे पथ्य पाळले तर अपघात टाळता येतील.
तर शहराचा श्वास मोकळा होईल
राज्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आगामी काळात शेवगावची संभाव्य वाढ विचारात घेऊन बारामती- औरंगाबाद राज्यमार्गा वरुर भगूर गावाच्या पुढे दोन्ही बाजूस बाह्यवळण रस्ते काढून डाव्या बाजूचा बाह्यवळण रस्ता नेवासे नाशिक रस्त्याला जोहरापूरच्या ढोरानदी जवळ जोडावा तर उजव्या बाजूचा बाह्यवळण बीड रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ जोडावा. तेथून तोच बाह्यवळण औरंगाबाद बारामती राज्यमार्गाला तळणीच्या माथ्यावर जोडून तेथून तो नाशिक मार्गाला ढोरानदीजवळ निघणाऱ्या बारामती औरंगाबाद बाह्यवळण रस्त्यास जोडला तर या चारही मार्गावर होणारी थेट वाहतूक शेवगाव शहरात न घुसता बाहेरून होऊ शकते व वाहतूक कोंडी व अपघात होणार नाही असे नागरिकांचे मत आहे.