-हिमांशू
एकेकाच्या भात्यातून खास ठेवणीतले “आयटम’ बाहेर निघू लागले म्हणजे निवडणूक जवळ आली. एक काळ असा होता, जेव्हा शेजारच्या राज्यात निवडणूक होऊन गेली, तरी पत्ता लागायचा नाही. तेवढं राज्य सोडलं तर बाकी कुणाला त्या निवडणुकीत फारसा इंटरेस्ट नसायचा. पण आता कोणत्याही राज्यात निवडणूक लागली, की संपूर्ण देशाचं लक्ष त्या राज्याकडे वळतं. (किंबहुना वळवलं जातं.)
तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे प्रत्येक राज्यांतल्या लोकांच्या समस्या वेगवेगळ्या; पण निवडणुकीची धामधून सुरू झाली की, आपल्याला आपल्या समस्यांचा तेवढ्यापुरता का होईना विसर पडतो. बिहार विधानसभा निवडणूक, सोबत मध्य प्रदेशातली पोटनिवडणूकसुद्धा होतेय. म्हणजे मनोरंजनाचं “कॉम्बो पॅक’! एकावर एक फ्री! करोना वगैरे अंधश्रद्धाच असावी, असं वाटू लागलंय. या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून लोक मुक्त होऊ लागलेत.
भले बिहारचे उपमुख्यमंत्री पॉझिटिव्ह असतील. भले आणखी काही पक्षांमधले वरिष्ठ नेते पॉझिटिव्ह असतील. पण म्हणून काय झालं? निवडणूक प्रचारातून करोनाचा मुद्दा गायब आहे, असे लेख काही काही बोरूबहाद्दरांनी खरडले. ट्विटरवर चिवचिवाट झाला, फेसबुक-व्हॉट्सऍपवरसुद्धा काही शाब्दिक बुडबुडे सोडले गेले. पण मग सत्ताधाऱ्यांनी असा काही मास्टरस्ट्रोक मारला, की सगळ्यांची बोलतीच बंद झाली. पक्षानं जाहीरनाम्यात असं नमूद केलं की, बिहारमधल्या प्रत्येक नागरिकाला करोनाची लस फुकट देणार!
तात्पर्य, करोनाची लस फुकट हवी असेल, तर संबंधित राज्यात निवडणूक लागणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशात पोटनिवडणूक असल्यामुळे तिथे अशी काही घोषणा होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, करोनाची लस ही सध्या तरी “बाजारात तुरी’ असल्यामुळे बिहारमध्ये तरी लोकांना ही घोषणा कितपत भावते हा प्रश्न आहेच. करोनाचा मुळातच कंटाळा आलाय.
बोरूबहाद्दरांच्या म्हणण्यानुसार, चीनची आगळीक आणि रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था हे मुद्देही प्रचारात दिसत नाहीत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा ऐन नवरात्रातसुद्धा कुणी पुढे आणला नाही, असं काहीजण म्हणतात. परंतु हे मुद्दे प्रचारात आणून निवडणूक जिंकता येते, याचं एखादं उदाहरण दाखवा म्हटलं तर या बोरूबहाद्दरांचीही वाचा जाईल. कोण कुठल्या पक्षातून फुटला, कोण कुठल्या पक्षात गेला, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण नाराज, कोण खूश, कोणाची विशेष काळजी घेतली गेली, कुणाकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं, हे प्रचाराचे खरे मुद्दे असतात.
आताशी कुठं प्रचाराला सुरुवात झालीय. पुढच्या टप्प्यात काही मुद्दे आक्रमकपणे मांडले जातीलच. निवडणुकीतली राजकीय गुंतागुंत आणि आपापल्या पक्षाची सद्यःस्थिती तरी नेत्यांच्या लक्षात येऊद्या. उरलाच वेळ तर मुद्दे वगैरे येतीलच की!
तूर्तास गर्दी आकर्षित करण्यासाठी नेत्यांची “आयटम सॉंग’ सुरू झाली आहेत. कोण कुणाचा कोणत्या शब्दांत पाणउतारा करावा, याबद्दल कोणतीही नियमावली नेतेमंडळींना लागू नाही. आजकाल सोशल मीडियावर सामान्य नागरिकसुद्धा काहीही बोलून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतात. नेतेमंडळींना तर चोवीस तास कडेकोट बंदोबस्त पुरवला जातो. त्यांना बेताल वक्तव्ये करताना घाबरण्याचं कारणच काय?
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून आचारसंहिता लागू आहे, तरीही ठेवणीतली वक्तव्यं वाढत जातील आणि आपली अधिकाधिक करमणूक होईल, याबद्दल आपण निर्धास्त राहूया.