शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युती झाल्यानंतर शिवशक्ती व भीमशक्तीवरून राजकीय वर्तुळात व प्रसारमाध्यमांत ते एकत्रित आल्याचे चित्र भासवले गेले. ही शक्ती प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रभाव टाकणार?
शिवसेना-वंचितची दखल घेत “किंचित आणि वंचित’ एकत्र आल्याची संभावना भाजपने केली, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपणास काहीही माहिती नाही, असे सांगत महाविकास आघाडीत वंचित समावेशाबाबत कानावर हात ठेवले. मनसेने तर दखलपात्रही नाही सांगत युतीच्या भवितव्यावरच बोट ठेवले. त्यामुळे भाजपने उडवलेली खिल्ली योग्य व माफक असल्याची चर्चा सकाळच्या थोड्याशा गारव्यात चहाचा आस्वाद घेत नागरिकांमध्ये होऊ लागली.
शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर वंचितचे प्रकाश आंबेडकरांबरोबर उद्धव ठाकरेंचे संबंध रंगू लागले. “नवा भिडू नवा राज’ अशी समीकरण प्रसारमाध्यमांच्या समोर आणाभाका घेत जुळू लागली. सुरुवातीला थोडी का-कू करत दोन पावले सोयीने पुढे-मागं होत होती. परंतु नंतर काही दिवस लोटताच मनाचा हिय्या करून शिवसेना व वंचित यांनी निवडणुका एकत्रित लढणार असे जाहीर केले. ही युती फक्त त्यांच्या दोघांपुरतीच मर्यादित असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टही केलेलं होतं. तरीही दोघांच्या युतीवरून राजकीय वर्तुळात नको तेवढे प्रश्न उपस्थित झाले. एवढे दिवस तीन चाकांची रिक्षा चार चाकांची मविआ बनली वगैरे चर्चा रंगली. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या युती सरकारविरोधी ही गाडी राज्यभर सुसाट धावणार वगैरे स्वप्न दाखवली गेली. तसेच राज्यभर शिवशक्ती व भीमशक्ती एकत्रित आली वगैरे पूर्वीचे दाखले देत नारे दिले जाऊ लागले.
तथापि शिदेंच्या बंडांनतर गलितगात्र होऊ लागलेली किंवा मोडकळीला आलेली उरली सुरली किंवा शिलकी शिवसेनाही अशी तशी कशाला सोडा? या हेतूने किंवा तसे उद्दिष्ट ठेवून राजकारण करणाऱ्या भाजपने शिवसेनेसह उद्धव ठाकरे व मातोश्रीचे स्थानच नष्ट करण्याकरिता त्यांच्यावर घणाघात घालायला सुरुवात केली. आधी शिलकी शिवसेना संबोधणारे भाजपा नेते शिवसेनेला किंचित असे हिणवत “किंचित व वंचित’ एकत्रित आल्याची टीका करून आणखीन धोपटून काढायला लागले. त्यांच्या या टीकेमुळे दरवेळेस पेटून उठणारी शिवसेना मशाल हाती धरून वणवा न पेटवता, दुबळ्या, जर्जर झालेल्या वाघासारखी समोर फेकलेल्या शिकारीवर तुटून पडू शकली नाही. संजय राऊतांनी थोडाफार प्रतिकार करून पाहिला परंतु त्यांनाही सक्षमपणे बाजू लावून धरणे जमले नाही. तेही मातोश्रीवरच अवलंबून राहिले; पण तिथून हुंकार-देकार काहीच आले नाही. शिवसेनेशी ही स्थिती पाहता जयप्रकाश नारायणांच्या जनता दलाचे जसे छिन्न-विच्छिन्न तुकडे होताना अनेक नेत्यांनी पाहिले तसेच काही काळ वाटले.
पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ही अवस्था भाजपा किंवा बाळासाहेबांची शिवसेना तुटून पडते म्हणून झाली असे वाटत असेल, तर तसेही म्हणता येणार नाही. शिवसेनेचे सत्तेतील मित्र म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या पक्षांनीही स्वत:चे गेल्या अडीच वर्षातील राजकारण करत केली आहे. पण भाजपच्या बरोबरच्या रस्सीखेचीच्या राजकारणांत उद्धव ठाकरे हे सर्व विसरले. पण त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस शिवसेनेला त्यांच्या मविआच्या घोळातून सहजासहजी निसटू देणार नाहीत. वंचितबरोबर युती करताना शिवसेनेने आम्हाला विचारले नाही. हे आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने अनेकवेळा राजकीय पटलावर पिटून काढत ठाकरेंची शिवसेना मविआसह निवडणुकांत भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लढेल असा विश्वास ते देत राहिले. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मविआत आतापर्यंत एकत्रित दिसणारे हे पक्ष ठामपणे ग्वाही देत नव्हते, हेही तितकेच प्रखरपणे जाणवते.
या सर्व राजकारणात नाममात्र अस्तित्व ठेवणारी राज ठाकरेंची मनसेही शिवसेनेवर तोंडसुख घेत आहे. मनपात भ्रष्टाचार झाला. मातोश्रीचा त्यात हात वगैरे आरडाओरडा करत सगळ्यांचे लक्ष वेधत शिवसेनेऐवजी हिंदुत्वाचे कैवारी आम्हीच असे छाती पिटत पुढे येत शिवसेना-वंचित काहीच नाही, ही शिवशक्ती-भीमशक्ती नुसतीच बोलबाला वगैरे टीका करत राहिले. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे तर शिवसेनेला इतके घालून पाडून बोलू लागले. सुरुवातीला सगळ्याच राजकीय पक्षांचा समाचार घेणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेंडणेकर व मनीषा कायंदेही नंतर गप्पच झाल्या. काही काळानंतर मीडियालाच त्या दोघीही टाळू लागल्या. त्यामुळे जर्जर झालेला ठाकरेंच्या शिवसेनेचा वाघ हा वंचितच्या खांद्यावर पुढे जाताना दिसला. तेव्हा कुणाच्या खाद्यांवर कुणाचे ओझे? हे गाणे आपसूकच ओठावर आले.
पण शिवसेना-वंचित युतीमुळे वंचित इतकी जोरात आली की, लोकसभा निवडणुकांत वंचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाबरोबर युती करण्याची स्वप्न रंगवू लागले. त्यांना भाजपने लगेच आवतणं देत आवजाव घर तुम्हारा असे दाखवून दिले नाही. त्यांनी सोयीने या सगळ्यावर मौन बाळगले. कदाचित ही त्यांची समयसूचकता असू शकते किंवा आरपीआयच्या रामदास आठवलेंना काही काळ बाजूला करून प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा वापर करत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आणण्याची चाल असू शकते, ते नाकारता येणार नाही.
परंतु भाजप हिणवत असेलेली किंचित-वंचित युती मुंबई व ठाणे मनपा निवडणुकांत खरंच किंचित दिसणार का? की नुसतेच मनसे म्हणते तशी शिवशक्ती व भीमशक्ती प्रयोग ही बला नाही तर नुसताच बोलबाला ठरणार का? की भाजपच्याबरोबर युती करणारी बाळासाहेबांची शिवसेना विसर्जित करून पुलोद कॉंग्रेसमध्ये विसर्जित झाली होती अगदी तशीच भाजपात विलीन करून होणार का? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील मुंबई दौऱ्यात मिळण्याची शक्यता आहे.