भारतीय क्रिकेट विश्वातील महिलांची बाजू सांभाळणाऱ्या 19 वर्षांखालील युवतींनी पहिलावहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून एका मोठ्या पराक्रमाची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये महिलांचे स्थान दिवसेंदिवस जास्तच प्रबळ आणि महत्त्वाचे होत असण्याच्या पार्श्वभूमीवर 19 वर्षांखालील युवा क्रिकेटपटूंनी केलेली ही कामगिरी निश्चितच महत्त्वाची मानावी लागणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळसुद्धा महिलांच्या क्रिकेटला पुरुषांच्या क्रिकेट एवढेच महत्त्व देत असताना महिलांनी केलेली ही कामगिरी या क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित करत आहे. गेल्या काही कालावधीमध्ये पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच भारतीय महिलांनीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. मिताली राज, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करून अनेक विक्रम नोंदविले आहेत. त्यानंतरच्या पिढीमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा यांसारख्या खेळाडूंनीही आपले नाव कोरले आहे. महिला क्रिकेटपटूंच्या नियमित भारतीय संघामध्ये यांच्यासारखे गुणवान खेळाडू असल्याने गेल्या काही कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा जिंकल्या होत्या. पण याच कालावधीमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये मात्र या संघाला सातत्याने पराभव स्वीकारावा लागत होता. त्यामुळे पुरुषांच्या नावावर विश्वचषक जमा असले तरी भारतीय महिलांच्या नावावर मात्र कोणताही विश्वचषक नव्हता. पण आता 19 वर्षांखालील या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करून महिला विश्वचषक जिंकून एका पराक्रमाची नोंद केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हापासून या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून या स्पर्धांकडे आगामी कालावधीतील खेळाडूंची तरुण पिढी म्हणूनच पाहिले जाते. पुरुषांच्या क्रिकेटचा विचार करता 19 वर्षांखालील क्रिकेटमधील यशाचाच आधार घेऊन युवराज सिंग, विराट कोहली, मोहम्मद कैफ, शिखर धवन, पृथ्वी शॉ असे अनेक खेळाडू भारतीय संघाचा भाग बनले. साहजिकच या विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडूंनासुद्धा नियमित संघामध्ये स्थान मिळण्याची संधी आता खुली झाली आहे. अर्थात, या विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व करणारी युवा खेळाडू शफाली वर्मा आताही नियमित भारतीय संघाचा भाग आहे आणि धडाकेबाज कामगिरीमुळे ती महिला क्रिकेटमधील “वीरेंद्र सेहवाग’ या नावाने ओळखली जाते. समोर कोणताही संघ असो आणि कितीही आक्रमक गोलंदाज असोत वीरेंद्र सेहवाग स्टाइल फलंदाजी करून सामन्याचे रूप पालटण्याच्या तिच्या या अनुभवाचा फायदा निश्चितच 19 वर्षांखालील इतर खेळाडूंना झाला. सामूहिक एकत्रित कामगिरीमुळेच भारतीय महिलांच्या हातामध्ये हा विश्वचषक विराजमान झाला.
गेल्या काही कालावधीमध्ये भारतीय महिला क्रिकेटच्या विकासासाठी नियामक मंडळ सातत्याने प्रयत्न करत असल्याने त्याचेच फळ आता समोर येत आहे. पूर्वी पुरुषांच्या क्रिकेटच्या तुलनेत महिलांच्या क्रिकेटला निधीही उपलब्ध होत नसे. मानधनही खूप कमी मिळत असे. पण आता मात्र सर्वच पातळीवर दोन्ही क्रिकेटमध्ये समानता आणण्यात आली आहे. त्यामुळे नवनवीन महिला खेळाडू या क्रिकेटकडे वळू लागले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटच्या आयपीएलचीसुद्धा घोषणा केली असल्याने ज्या खेळाडूंना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती, त्यांनासुद्धा आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यातूनच नवनवीन खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. भारतीय महिलांनी विश्वचषकावर नाव कोरताच क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी या संघासाठी पाच कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करून त्यांना निश्चितच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुळात महिला क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधील रॅंकिंगचा विचार करता भारतीय महिलांचे स्थान वरचे आहे. कसोटी असो एक दिवसीय क्रिकेट असो किंवा टी 20 क्रिकेट असो, हरमनप्रीत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा या खेळाडूंनी पहिल्या 10 मध्येच स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या पुरुषांच्या संघाने ज्या प्रकारे आपली आघाडी कायम ठेवली आहे त्याच प्रकारचा दबदबा आता महिला क्रिकेटरसुद्धा निर्माण करणार आहे, असेच संकेत या विजयाने मिळाले आहेत. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या 19 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा विचार करता या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंना ज्या प्रकारे मुख्य संघात संधी देण्यात आली तशाच प्रकारचा विचार आता या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंचाही होण्याची गरज आहे.
भारतीय संघाची राखीव खेळाडूंची फळी जबरदस्त आहे. महिला क्रिकेटची राखीव खेळाडूंची फळीसुद्धा तशीच जबरदस्त होण्याचे संकेत या विजयाने दिले आहेत. महिलांच्या आयपीएल संघांच्या लिलाव प्रक्रियेत ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली ती पाहता आगामी कालावधीमध्ये महिला क्रिकेटला अजूनच प्रोत्साहन मिळण्याचे संकेतही मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा महिलांचे आयपीएलचे सामने खेळवले जातील तेव्हा त्या सामन्यांमधूनसुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेली महिला खेळाडूंमधली गुणवत्ता समोर येणार आहे. आता भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या नावावर एका विश्वचषकाची नोंद झाली असल्याने महिला क्रिकेटने निश्चितच एक जोरदार उडी मारली आहे. गेले काही महिने ज्या प्रकारे जाणीवपूर्वक महिला क्रिकेटला प्रोत्साहन दिले जात आहे आहे त्या निर्णयाचे समर्थन निश्चितच महिला क्रिकेटपटूच्या या पराक्रमामुळे होत आहे.