सिद्धयोगी श्री शंकर महाराज हे कधीकधी आपल्या भक्तांना मोठ्या विनयाने सांगत की, माझ्या सद्गुरूंनी म्हणजेच स्वामी समर्थांनी मला “तू तुरटी हो’ अशी शिकवण दिली. तेव्हा मी त्यांना विचारले होते की, “”स्वामी! तुरटी हो म्हणजे नेमकं काय?” तर त्याची फोड करीत स्वामी मला म्हणाले, “”अरे तुरटी हो म्हणजे जशी तुरटी गढूळ पाण्यात फिरविली की ती आपल्या अंगच्या शक्तीने त्या पाण्याची गढूळता, मलिनता अशुद्धता ही दूर करते तसे तूसुद्धा सहवासात जे येतील त्यांच्या मनोवृत्तीचा धौतीयोग करत राहा, त्यांच्या जीवनात तुझ्या बोधाची शिकवणीची तुरटी फिरव आणि त्यांना निर्मळ पवित्र कर.”
खरोखरच त्या सिद्ध अवलियाने तेच कार्य केले. त्यांनी एकदा भ्रंमतीत असाच एक परिवर्तनाचा दिव्य चमत्कार घडविला. एकदा महाराज मध्य प्रदेशाच्या परिसरात भ्रमंती करत असताना एका रानावनातल्या वाटेत त्यांची गाठ काही दरोडेखोरांशी पडली. त्यांनी महाराजांना दरडावून “”बऱ्या बोलाने तुझ्याकडे जे आहे ते आम्हाला दे नाही तर प्राणास मुकशील” असे धमकावले. तेव्हा वाटमारी करणाऱ्या वाल्या कोळ्यास नारदांनी जसे उत्तर दिले तसे उत्तर महाराजांनी त्या दरोडेखोरांना दिले. ते म्हणाले, “”माझ्याकडे जे धन आहे, ते तुम्हाला घ्यायला आवडत असेल तर घ्या. मी तर त्या प्रभू नामधनाचाच लुटेरा आहे.
बाबांनो! हे व्यवहारातले नोटा, पैशाचे, दागदागिन्यांचे, सोन्या-चांदीचे धन हे तुम्हाला कधीच खरं सुख समाधान देणार नाही. तुम्ही कुठवर हे असं रानावनात तोंड लपवून फिरत जगणार. कुठवर शिक्षा, तुरूंगवास प्रसंगी फाशी या सर्वांपासून असे लपतछपत दूर राहणार! त्यापेक्षा एक करा. हा धंदा, ही वाटमारी हे दुर्वर्तन सोडा. यात तुमचे कल्याण होणार नाही. पण जर तुम्ही त्या नाम धनाची कास धराल, सन्मार्गाने वाटचाल कराल. त्या ईश्वरावर हवाला ठेवाल तर मात्र तुमचा उद्या नक्कीच चांगला होईल. तुमचे भले होईल.”
महाराजांच्या या अमृत वचनांनी त्या दरोडेखोर लोकांच्या मनोवृत्तीचे परिवर्तन झाले. त्या पापाचरणाच्या वाटेवर वाटचाल करणारी त्यांची पावले सन्मार्गावर पडली. त्यांनी मलीन जीवन गंगा पुन्हा शुद्ध आणि निर्मळ झाली.