विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचे जे बीज रोवले त्याचा आता बहुविशाल असा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षामुळे आपल्या मराठी रंगभूमीचे नाव भारतीय संस्कृतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल, असेच वैभवशाली कार्य मराठी रंगभूमीचे आहे. आज रंगभूमी दिन.
कोणत्याही राष्ट्रांत असलेली नाट्यरूपी ग्रंथसंपदा आपल्या भारतात देखील आहे. निश्चितच भारतीय नाट्य शाखा समृद्ध होती यात काही दुमत नाही, अगदी आधुनिक मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तरी आपल्या लक्षात येते की, मराठी रंगभूमीला 179 वर्षांची द्विशतकाकडे झेपावणारी भरभक्कम अशी परंपरा आहे. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे विष्णुदास भावे यांनी “सीता स्वयंवर’ या आख्यान वजा मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली. सांगलीच्या अधिपतींनी दिलेल्या आदेशानुसार हा नाट्य प्रयोग साकारण्यात आला होता. हा प्रयोग पूर्वीच्या नाट्य प्रकारापेक्षा सर्वच दृष्टीने आधुनिक कलात्मक व सुसंस्कारित असा होता. या प्रयोगामुळे विष्णुदास भावे यांना “आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक’ म्हटले जाते.
या ऐतिहासिक कार्याचे महत्त्व आणि औचित्य जपण्यासाठी दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी “मराठी रंगभूमी दिन’ साजरा करतो. ही नाट्यप्रयोगाची घटना तमाम मराठी रंगकर्मीसाठी एखाद्या सणासारखीच आहे. दरम्यानच्या काळात मराठी रंगभूमीवर बरीच स्थितंतरे घडली. त्यास सामोरे जात मराठी रंगभूमीने मोठी झेप घेतली.
सुरुवातीचा कालखंड
सुरुवातीच्या कालखंडात किर्लोस्कर, देवल, श्री. कृ. कोल्हटकर, खाडिलकर, वरेरकर, शं. प. जोशी, वीर वामनराव जोशी, शुक्ल यांनी पौराणिक, सामाजिक विषय आपल्या नाटकांतून हाताळले. 1930 नंतर महाराष्ट्रात रंगभूमीवरील नाट्य प्रयोगामध्ये नावीन्य निर्माण झाले. तसे पाहता रंगभूमीवरील प्रयोगाच्या बाबतीत नावीन्य निर्माण करून रंगभूमी वास्तववादी करण्याचे काम वरेरकरांनी 1930 पूर्वीच केले होते. या दरम्यान 3 मे 1913 रोजी “राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट आणि 14 मार्च 1931 रोजी “आलाम आरा’ हा पहिला बोलपट आला. साहजिकच नाटकातील कलावंत मंडळी या नव्या क्षेत्राकडे वळली. बोलपटाचे नवयुग सुरू झाले. तरीही 1933 च्या आसपास काही मंडळी काहीतरी वेगळे करण्याचा मानस करून कामाला लागली. यात वर्तक, काणेकर, आतळेकर आदींचा समावेश होता. आचार्य अत्रे यांनीही आपल्या नाटकांतून वेगळेपण दाखवले. तसेच मो. ग. रांगणेकर यांनी आपल्या “कुलवधू’ या नाटकारद्वारे एक वेगळा प्रयत्न केला. या दरम्यान तात्यासाहेबांच्या म्हणजे वि. वा. शिरवाडकरांच्या आगमनाने नाट्यसृष्टीला चैतन्य लाभले. 1943 साली सांगली येथे शतसांवत्सरिक रंगभूमीच्या सोहळा झाला. या सोहळ्याने रंगभूमीला प्रेरणा, ऊर्जा, नवतेज दिले. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात महाराष्ट्रात नाटकाचा उपयोग स्वराज्याच्या आंदोलनासाठी करण्यात आला. हे आंदोलन अधिक तीव्र कसे होईल. लोकजागृती कशी होईल, यासाठी नाटकाचा वापर झाला. स्वातंत्र्याची ज्योत नाटकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न झाला.
स्वातंत्र्योत्तर कालखंड
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशातील नाट्यकला चौफेर वाढली. या कलेला सरकारने तसचे नाट्य रसिकांनी आश्रय दिला, प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यानंतरच्या पुढील सहा दशकांत मराठी रंगभूमीवर अनेक प्रकारचे बदल झाले. प्रयोगही झाले त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या मराठी रंगभूमीचा विचार करताना या काळातील लेखकांनी केलेल्या विविध प्रयोगांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. विशेष म्हणजे या 1950 ते 1970 या काळातील नाटककारांनी थोडेसे धाडस दाखवून पूर्वीच्या काळातील पौराणिक, सामाजिक, राजकीय विषयांचा आक्रस्ताळेपणा नष्ट केला. नाट्य रसिकांना निखळ मनोरंजन दिले. या कालावधीत लेखकांनी चौफेर लेखन केले ते एकाच प्रवाहात अडकले नाहीत. या काळात व्यावसायिक, प्रायोगिक लोकरंगभूमी, बालरंगभूमी एकांकिका अशा सर्वच नाट्य प्रकारांचे लेखन झाले. व्यावसायिक नाटकांसोबत प्रायोगिक, समांतर नाटक होऊ लागली. या काळात अनेक लेखकांनी विपुल लेखन केले आणि मराठी रंगभूमी समृद्धी झाली.
वादळी कालखंड
1970 ते 80 या दशकात मराठी रंगभूमीवर मोठी वादळं झाली. किंबहुना हा कालखंड रंगभूमीसाठी वादळी कालखंड ठरला. खरे तर रंगभूमीसाठी वादळ निर्माण होणे, ही बाब काही नवी नाही. “भाऊबंदकी’ त्याआधीचे “कीचकवध’ या नाटकांचा 1910 मध्ये प्रेस ऍक्टने बळी घेतला. “कीचकवधात’ जुलमी राज्यकर्त्यांचा वध दाखवला म्हणून ते प्रेस ऍक्टच्या कहरात दगावले, “भाऊबंदकीत’ राज्यकर्त्यांचा केवळ निषेध असल्यामुळे ते बचावले. अशी उदाहरणे आहेत. मात्र या 70 ते 80 च्या दशकात नवीन दृष्टीने विचार करावयास प्रेरित केले. वसंत कानेटकरांनी आपले अजरामर नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिले. तसेच तेंडुलकरांनी “घाशीराम कोतवाल’ लिहून वादळ निर्माण केले. या नव्या प्रयोगाने प्रायोगिक नाटकांकडे पाहण्याची दृष्टी दिली. तसेच या काळात मराठी रंगभूमीवर एक नवीन गोष्ट झाली ती म्हणजे मराठीतील काही नाटके परभाषेत गेली तर काही परभाषेतून मराठीत आली. 1980 ते 1990 या दशकातील नाटके केवळ त्या त्या दशकापुरतीच मर्यादित न राहता आजही रंगभूमीवर आपले अस्तित्व दाखवत आहेत. याचे संपूर्ण श्रेय त्या नाटककारांनाच जाते.
यशस्वी प्रयोग
1990 ते 2022 या काळात मराठी रंगभूमीची प्रगती पाहता एक संपूर्ण वेगळा लेख होऊ शकतो तरी त्याचा थोडक्यात परामर्ष घेता झालेली नेत्रदीपक प्रगती लक्षात येते. या 32 वर्षांच्या काळात अनेक नामवंत नाटकारांनी, दिग्दर्शकांनी आपली वेगवेगळी शैली वापरून रंगभूमीवर विविध प्रयोग केले. व्यावसायिकपासून ते प्रायोगिक अशा स्तरांवर नवनवीन प्रयोग या काळात पाहावयास मिळाले. कोणी महानाट्य तर कोणी त्रिनाट्य तर कोणी दीर्घांक असे वेगवेगळे नाट्य प्रयोग यशस्वीरित्या साकारले. तसेच काही नाटकांनी गदारोळही केला. थेट संसदेतही याचे पडसाद उमटले होते. मराठी रंगभूमीच्या समृद्धीसाठी आजपर्यंत अनेक मान्यवरांनी आपले योगदान दिले.