– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
चीन करोना महामारीला कारणीभूत असूनही अनेक देशांनी “थॅंक्यू चीन’ असे फलक झळकावले. आपल्या ताकदीवर चीन जगातील मीडिया हाउसेस आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे.
जगातील सर्वात महाभयंकर जैविक महायुद्ध किंवा जैविक महामारी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चीन विरोधात प्रचंड राग होता; परंतु आता चीनने हे माहिती युद्ध पूर्णपणे जिंकले आहे आणि चीनच्या विरोधातला राग नाहीच, चीनला जैविक महायुद्धामध्ये लस डिप्लोमसी आणि इतर वैद्यकीय मदत केल्यामुळे धन्यवाद दिले जात आहेत.
आपल्या प्रचंड आर्थिक ताकदीचा वापर करून चीनने अमेरिका आणि युरोप खंडातल्या मीडिया हाउसेसना विकत घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. चायनीज व्हायरस, चिनी विरोधी बातम्या पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. युरोपमधल्या आणि अमेरिकेतील सरकारी संस्था किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी दिलेली चिनी विरोधातील विधाने त्याच देशातील मीडियाने दाबून टाकली, चीनच्या बाजूने लेख लिहिले.
युरोपमध्ये अनेक ठिकाणी मोठे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये “थॅंक्यू चीन’ असे लिहिलेले दिसते. चीनच्या या मानसिक महायुद्धाचा आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासाचे महत्त्वाचे निष्कर्ष आहेत की, एवढी मोठी महामारी चीनने सुरू केल्यानंतरसुद्धा जग चीनला दोषी मानत नाही. उलट हा दोष त्या देशांमध्ये असलेल्या केंद्र व राज्य सरकार आणि सरकारी संस्थांवर टाकला जातो.
मीडियाला खरेदी करण्याकरता उपाय
परदेशातील मीडियाला खरेदी करण्याकरता चीन अनेक उपाय योजतो. त्यांच्या वार्ताहरांना चीनमध्ये पर्यटक म्हणून नेले जाते, त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पूर्णपणे चीन करतो. केवळ पैशाकरता ते चीन म्हणतो ते लिहितात व बोलतात. युरोप आणि अमेरिकेच्या मीडियामधील अनेक वृत्तपत्रांशी करार करून त्यांना चिनी मीडियाने पाठवलेल्या 50 बातम्या व चीनने पाठवलेले लेख प्रकाशित करावे लागतात. चीनने आपली प्रचंड “मीडिया सैन्य’ उभे केले. यामध्ये त्यात या देशात असलेले चिनी नागरिक, चिनी हस्तक, पैसे देऊन तयार केलेली सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी सामील होती.
अमेरिका, युरोपमधली मीडिया चीन कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र
अमेरिका आणि युरोपमधली मीडिया आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र बनलेले आहे. कम्युनिस्ट पार्टीचे चीनमधले मुखपत्र आहे “ग्लोबल टाइम्स’. परंतु अशीच अनेक ग्लोबल टाइम्स चीनने युरोप आणि अमेरिकेमध्येसुद्धा तयार केलेले आहेत. इतकेच नव्हे तर चीनने या देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांना विकत घेऊन या देशातील चिनी विरोध कमी केला आहे आणि उलटे चीनच्या बाजूने लिहिले जात आहे.
ट्विटर, फेसबुक किंवा इतर प्रचंड मोठे सोशल मीडिया दिग्गज भारताचे कायदे मानत नाहीत. मात्र, ते चीनचे ऐकतात. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया चीनमध्ये नाही. कारण चीनने त्यांना तिथे यायला परवानगी दिलेली नाही. मात्र, चीनच्या बाहेर अमेरिका, युरोप आणि इतर जगातल्या राष्ट्रांतून चीनने तयार केलेली ट्रोल आर्मी या माध्यमांचा वापर करून चीन सोयीस्कर बातम्या प्रकाशित करतात. त्यांना थांबवले जात नाही. मात्र, चीन विरोधात काही लिहिले गेले तर ते थांबवतात.
सध्या जगातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची आर्थिक घडी, चिनी व्हायरसमुळे पूर्णपणे बिघडलेली आहे. बहुतेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्यांचा खप आणि टीआरपी हा 50 ते 60 टक्क्यांनी कमी झालेला आहे, त्यांना पुरेशा जाहिराती मिळत नाहीत, त्यांच्या या खराब आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, चीनने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विकत घेतले आहे.
अमेरिकेतील मोठ्या मीडिया हाउसेसना विकत घेतले
चीनने अमेरिका, युरोपमधील मीडिया हाउसेसना विकत घेण्यासाठी त्यांच्यामध्ये आर्थिक घुसखोरी केली आहे. काही ठिकाणी इतर देशांमधील कंपन्यांमधून या मीडिया हाउसेसमध्ये शेअर्स विकत घेण्यात आले आहे. अनेक वेळा अमेरिकेतल्या इतर कंपन्या/संस्थांचा वापर करून मीडिया हाउसेसचे शेअर विकत घेण्यात आले आहे. मीडियाची मते आपल्या बाजूला लगेच वळविण्याकरिता, दर वर्षी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या जातात. अमेरिकन मीडिया हाउसेसमध्ये चिनी शेअर होल्डिंग लक्षणीय आहे. नेमके हेच युरोपमधील मीडियात होत आहे. अमेरिकेमध्ये कायदा आहे की, मीडिया हाउसेसमध्ये ज्या वेळेस परदेशी शेअर खरेदी होते, ती जाहीर करणे आवश्यक असते. यामुळेच ही माहिती बाहेर आलेली आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या आमजनतेवर चीन आता त्यांची मने जिंकण्याचे युद्ध लढत आहे.
भारताने काय करावे
चीनने अमेरिका, युरोप खंडातल्या मीडियाला विकत घेतले तसे भारतामध्ये घडू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम प्रत्येक भारतीय मीडिया हाउसला त्यांच्यामध्ये असलेले परदेशाचे शेअर होल्डिंग प्रत्येक वर्षी आपल्या इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये जाहीर करणे जरुरी केले पाहिजे. त्यांना चीन किंवा परदेशांमधून मिळणाऱ्या जाहिरातींचे उत्पन्नसुद्धा जाहीर केले जावे. जे पत्रकार चिनी दौऱ्यावर जातात त्यांच्यावर खास लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर चीनच्या बाजूने होणारा प्रपोगंडा किंवा प्रचार थांबवणे गरजेचे आहे. असे सोशल मीडिया अकाउंट बंद करून त्यांना देशाच्या कायद्याखाली शिक्षा दिली जावी.
परंतु सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की, मीडियातील प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण केली जावी, ज्यामुळे ते चीन किंवा भारताच्या इतर शत्रू राष्ट्रांसाठी भारताच्या विरुद्ध दुष्प्रचार युद्ध करायलाच तयार होणार नाहीत.