कुर्नूल, ता. 29 – आंध्र मंत्रिमंडळांत आपल्याला मंत्रिपद मिळावे या अहमहमिकेने येथे बहुतेक सारी पुढारी मंडळी आली असून आंध्र मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियोजित मुख्यमंत्री श्री. टी. प्रकाशम, आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. संजीव रेड्डी इत्यादी सर्व मंडळी येथे दाखल झाली आहेत.
त्यांचा परस्परांशी खूप खल चालला असून पं. नेहरू येथे उद्या येणार आहेत. त्यापूर्वी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, अशा इर्ष्येने ते सारे मांड ठोकून बसले आहेत. 1 ऑक्टोबरपूर्वी आंध्र राज्याच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीचा समारंभ करण्याबाबत श्री. प्रकाशम आणि श्री. संजीव रेड्डी आंध्रचे राज्यपाल श्री. चंदुलाल त्रिवेदी यांच्याबरोबर विचारविनिमय करीत आहे.
कशातच काही नाही
संकल्पित आंध्र मंत्रिमंडळांत किती मंत्री घ्यावे व खातीवाटणी कशी करावी, यासंबंधी अद्यापी कसलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. बहुतेक मंत्रिमंडळात 7 किंवा 9 मंत्री घेतले जातील असे कळते.
काही आश्चर्य
मंत्रिमंडळ एकदा जाहीर झाल्यावर बऱ्याच जणांना आश्चर्याचे अनेक झटके बसण्याचा संभव असून प्रकाशमप्रमाणे काही लोक कॉंग्रेसचे सहकारी सभासदत्व पत्करून मंत्रिपदे स्वीकारण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कृषिकार लोक पक्षाचा समावेश होईल की नाही, या रहस्याचा अद्यापि भेद झालेला नाही.
सरकारच्या वीज कपातीने 11 कोटी रुपयांचे नुकसान
पुणें – “”मुंबई सरकारने 1951-52 साली केलेल्या वीजकपातीमुळे पुणे-मुंबई भागातील उद्योगधंद्यांची सुमारे चार कोटी रुपयांची हानी झाली आहे,” असे उत्तर अर्थमंत्री डॉ. जीवराज मेहता यांनी आज मुंबई वरिष्ठ विधीमंडळात श्री. आर. ए. खेडगीकर यांच्या प्रश्नाला दिले.
सरकारचा वीजकपातीचा हुकूम बहुतेक साऱ्याच उद्योगधंद्यांना आणि कारखान्यांना लागू करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. उत्पादन, मजुरांची कमाई इत्यादी मिळून एकूण 11 कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. पण खरे नुकसान 4 कोटी रुपयांपलिकडे जाणार नाही.