वेळ पडल्यास सरकारअन्नधान्य आयात करील
लखनौ, ता. 31 – “जर अन्नधान्याची परिस्थिती गंभीर राहिली तर सरकार धान्याची आयात करेल,’ अशी घोषणा केंद्रीय शेतकीमंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांनी येथे केली. ते पुढे असेही म्हणाले, अन्नधान्य खरेदीची परिस्थिती व मान्सून या गोष्टीवर देखील धान्य आयातीचा प्रश्न अवलंबून आहे. खुल्या बाजार पेठेमध्ये गव्हाची कृत्रिम टंचाई घाऊक व्यापाऱ्यांनी निर्माण केली आहे.
ग्रामीण भागात धान्यभाव भडकले
फलटण – गेला महिना झाला फलटणच्या स्वस्त धान्य वाटप दुकानातून लोकांना कसलेच धान्य मिळू शकले नाही. ज्यामुळे गोरगरीब जनतेचे व ज्यांची पोटे हातावर काम करून आहेत अशा शेकडो माणसांचे धान्यावाचून विलक्षण हाल होत आहे. सरकारी धान्य गोदामातसुद्धा धान्याचा कण शिल्लक नाही. म्हणून लोक महागड्या दराने बाजारात धान्य विकत घेत आहेत.
“कागदी सोन्याला’ भाव येणार, डॉलर-पौंडचे महत्त्व संपले
नवी दिल्ली- यापुढील काळात आंतरराष्ट्रीय नाणे व्यवहारात डॉलर किंवा पौंड यांना महत्त्व नसून कागदी सोन्याला महत्त्व राहील. देवघेवीचे व्यवहार यामुळे सुलभ होतील, असे मत डॉ. सिंग यांनी व्यक्त केले. डॉ. सिंग हे केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत. डॉ. सिंग यांनी असेही सांगितले की, भावी काळात सोने हेच सर्व आर्थिक व्यवहाराचे एकमेव सूत्र राहणार आहे.
पाकिस्तान यादवीचा धोका, सरहद्द गांधींचा इशारा
नवी दिल्ली – सरहद्द गांधी खान गफारखान यांनी पाकिस्तानात यादवी माजेल, असा इशारा पाक सरकारला दिला आहे. बलुची व पख्ततुनी यांचे दरम्यान द्वेषभावना पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास तो सरकारने मोडून काढला पाहिजे नाहीतर यादवीला तोंड देण्यास सिद्ध झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.