– माधव विद्वांस
“बहु असोत सुंदर, संपन्न की महा’ या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून सुपरिचित कवी, विनोदी लेखक, नाटककार आणि समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म नागपूर येथे 29 जून, 1871 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते.
कोल्हटकर कुटुंब मूळचे रत्नागिरी जवळील नेवरे येथील. त्यांचे पणजोबा गोविंदभट वाई येथे येऊन राहिले. त्यांना हरिपंत व महादेवशास्त्री ही दोन मुले. हरिपंत हे श्रीकृष्ण यांचे आजोबा. कोल्हटकरांच्या घराण्यात नाटक आणि लेखन जणू मुरलेलेच होते. महादेवशास्त्री हे अथेल्लोचे भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. हरिपंतांचे पुत्र कृष्ण हे श्रीपाद यांचे वडील. कृष्णराव नोकरी निमित्ताने अमरावतीस येऊन राहिले.
श्रीपाद यांना वयाच्या 9 व्या वर्षी तोंडाला लकवा आला व मान आणि जीभ यावर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांचे शिक्षणाचे 1 वर्ष वाया गेले. याची त्यांना खंत होती.त्यांच्या शारीरिक विकलांगतेची थट्टा होऊ लागल्याने ते काहीसे एकलकोंडे झाले होते. मात्र त्यांचे याच काळात वाचन सुरू झाले. ते पाचवीत असताना “संगीत शाकुंतल’ या नाटकाची चर्चा होऊ लागली होती. त्यांना नाटक लिहावेसे वाटू लागले. त्यांनी एक सुखमालिका नावाचे 5 अंकी नाटक लिहूनही काढले. श्रीपाद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले. नंतर पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
पुणे येथे शिकत असताना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अकोला येथे वकिली व्यवसाय करू लागले. याच वेळी वकिली बरोबरच त्यांच्या स्वतंत्र लेखनालाही बहर आला. वर्ष 1891 मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक “मृच्छकटिक’मध्ये अभिनय केला. त्यांनी आपल्या वाङ्मय सेवेचा आरंभ “संगीत विक्रमशशिकला’ नाटकावरील टीका लेखाने (1893) केला. त्यांचा “साक्षीदार’ हा विनोदी लेख वर्ष 1902 मध्ये ऑगस्ट-सप्टेंबरच्या विविध ज्ञानविस्तारच्या अंकात प्रसिद्ध झाला. न्यायालयातील साक्षीदारांच्या उलटतपासणीतून निर्माण झालेले विनोद त्यांनी मांडले आहेत.
तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या या विनोदी कथासंग्रहात सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अशा तीन व्यक्तीरेखांच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर बोट ठेवले. त्यांच्या अशा 18 लेखांचा “सुदाम्याचे पोहे’ हा संग्रह 1910 साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी 14 लेखांची भर घालून 1923 साली सुदाम्याचे पोहे अर्थात “साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. वर्ष 1913 मध्ये “ज्योतिर्गणित’ हा ज्योतिषशास्त्रावरील विवेचक ग्रंथही कोल्हटकरांनी लिहिला.
त्यांनी त्यांचे आत्मचरित्रही लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काव्य नाट्य व इतर लेखनासंबंधी लिहिले आहे. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना 1922 साली पुण्यास भरलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद व 1927 साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. वर्ष 1920 मध्ये सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. 1 जून 1934 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.