म्हैसूर-महाराष्ट्र सीमा प्रश्न
मुंबई, ता. 18 – “विधानसभेच्या अधिवेशनानंतर महाराष्ट्र-म्हैसूर सीमा प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातील कानडी प्रदेश म्हैसूरमध्ये घालावा व म्हैसूरमधील मराठी भाषा बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात घालावा असे आवाहन पंतप्रधानांना करण्यात येईल’, अशी माहिती मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितली. ते पुढे म्हणाले, “उपहारगृहांवर घातलेल्या निर्बंधाबाबत सरकार फेरविचार जरूर करेल.’
नव्या सरकारचे स्वागत
नवी दिल्ली – अखिल भारतीय पख्तून जिरगा-इ-हिंदने अफगाणिस्तानातील प्रजासत्ताक सरकारचे स्वागत केले आहे. अफगाणिस्तानने पख्तून लोकांच्या समाधानासाठी पख्तुनिस्तानचा प्रश्न सोडविला पाहिजे. भारतीय उपखंडात शांतता स्थापन करण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करावा.
भारतीय भाषा विकासाच्या दृष्टीने संस्कृत भाषा महत्त्वाची
पुणे – बहुसंख्य भाषांच्या विकासासाठीही संस्कृतची मदत महत्त्वाची आहे. व्यावहारिक आणि सांस्कृतिक या दोन्हीही दृष्टीने संस्कृत भाषेचे महत्त्व आहे, असे विचार मध्यवर्ती अर्थमंत्री व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती यशवंतराव चव्हाण यांनी सदर विद्यापीठाच्या बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना काढले.
गोधनाचे महत्त्व विसरू नका!
पुणे – “गोधन हे फार मोठे धन आहे. आपण तिकडे दुर्लक्ष करता कामा नये. शास्त्रोक्त न आधुनिक पद्धतीने गायींची जोपासना केली पाहिजे व अत्यंत मोलाच्या अशा गोधनाचा उपयोग करून घेतला पाहिजे’, असे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काढले.