देशाची सध्याची वाटचाल मार्क्सवादाला धरूनच!
पुणे, दि. 2 – देशाची सध्या चालू असलेली वाटचाल मार्क्सवादाच्या तत्त्वज्ञानाला अनुसरूनच आहे. परंतु याचा अर्थ पंतप्रधान इंदिरा गांधी कम्युनिस्ट झाल्या आहेत असे नव्हे, असे प्रतिपादन कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी आज येथे केले.
कोणत्याही विकसनशील समाजाला फॅसिझम किंवा मार्क्सचा कम्युनिझम या दोहोंपैकी एका तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतरच नसते. भारताच्या सध्याच्या परिस्थितीत दुसरा पर्याय स्वीकारण्याखेरीज सर्वांगीण प्रगती करता येणार नाही.
पोलीस खात्याची पुनर्रचना हवी
हैद्राबाद – पोलीस अधिकाऱ्यांना अधिक चांगले शिक्षण व पोलीस खात्याची नव्याने रचना करण्याची आवश्यकता केंद्रिय गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सर्वसामान्य माणूस अजून पोलीस स्टेशनवर जाण्यास भीतात. कारण त्यांना वाईट वागणूक मिळेल अशी शंका वाटते.
ते पुढे म्हणाले की, गुन्हा शोधकाला मिळणारी हीन वागणूक बंद व्हावी. देशातील पोलीस खात्याच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राने 160 कोटी रुपये देऊ केल्याचेही त्यांनी सांगितले.