महात्माजींचा पुतळा तरुण पिढीला स्फूर्ती देईल
पुणे, दि. 27 – पिढ्यान् पिढ्या गरिबीत खितपत पडलेल्यांची शक्ती वाढविणे हेच महात्माजींच्या जीवनाचे रहस्य होते. अशा राष्ट्रपित्याचा हा पुतळा सर्वांना विशेषतः तरुणपिढीला स्फूर्ती देत राहील, असे विचार परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महापालिकेतर्फे स्टेशनसमोर उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, महापालिकेतील सदस्य, सेवक यांनी घरोघरी पैसे जमा करून पुतळा उभा केला असल्याने हे त्यांचे औचित्यपूर्ण स्मारक ठरेल.
तीस वर्षांनंतर प्रथमच केंद्रातील सत्ता बदलेल
अंबाला – तीस वर्षांनंतर प्रथमच केंद्र सरकार बदलण्याची शक्यता यावेळी प्रत्यक्षात उतरणार आहे, असे जनता पार्टीचे सरचिटणीस लाल कृष्ण अडवानी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना अडवानी म्हणाले, निवडणुकांनंतर “लोकशाही कॉंग्रेस’ “जनता पार्टी’ विलीन होईल, अशी खात्री वाटते.
घटना दुरुस्ती बदलू
मुझफ्फरनगर – लोकसभा निवडणुकीनंतर जर जनता पार्टी अधिकारावर आली तर मिसासारखे कायदे तसेच 42वी घटना दुरुस्ती रद्द करील, असे चरणसिंग यांनी सांगितले.