मुंबई : मराठी माणसाने नेहमी जगाचा विचार केला आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला पसायदान दिले. मराठी भाषेने आजवर अनेक आव्हाने पेलली आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून खऱ्या अर्थाने शिव म्हणजे सर्व विश्व आहे हा विचार मांडला आहे. मराठी ही प्राचीन भाषा आहे. शेकडो वर्षांपासून अनेकांनी ही भाषा समृद्ध केली आहे.
जगातील अनेक भाषा संपल्या पण मराठी संपणे शक्य नाही. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे, ती ज्ञान भाषा झाली पाहिजे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
#मराठीभाषागौरवदिन : मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व वैद्यकीय शिक्षण मराठीत घेता येणार असून उच्च शिक्षणात गेल्यानंतर भाषेशी तुटणारे नाते जोडण्याचा प्रयत्न होत आहे. जगात सर्वात चांगले इंजिनिअर जर्मनीत आहेत, ते तेथील मातृभाषेत शिक्षण घेत असल्यामुळे हे घडत आहे. आम्हीच वर्षानुवर्षे इंग्रजीचा आग्रह धरून ठेवला. आता केंद्र सरकारनेही नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय स्वीकारला आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.