यापुढे आक्रमक लढाया परवडणार नाहीत
पुणे, दि. 28 – भारतासारख्या गरीब देशांना आक्रमक लढायांसाठी खर्च वाढविण्यापेक्षा सुरक्षात्मक व विश्वसनीय साधनांवर अवलंबून राहण्याचा विचार करावा लागेल, असे विचार संरक्षण उत्पादनमंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गुप्तहेर विभागात गणक यंत्राची मदत घेऊन युद्धक्षेत्रात शत्रूसैनिकांचा आणि शस्त्रास्त्रांचा नाश करणे शक्य आहे हे दुसऱ्या महायुद्धानंतर स्पष्ट झाले आहे. दूरवरून नियंत्रण केलेल्या निरीक्षण साधनांनी शत्रूला टिपता येण्याची शक्यताही नजीक येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता प्रचंड सैन्य वा समोरासमोर शत्रूला तोंड द्यावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.
म. फुलेंच्या मार्गानेच समाजसुधारणा होईल
औरंगाबाद – सध्याच्या परिस्थितीत समाजात असलेल्या उणिवांचे उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी गेल्या शतकात सांगितलेल्या सामाजिक क्रांतीच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असे मंत्री रत्नाप्पा कुंभार म्हणाले.
कुटुंब नियोजन सक्ती नाही
नवी दिल्ली – कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात दबाव आणला जातो, नागरिकांना त्रास दिला जातो या आरोपांचा स्पष्ट इन्कार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. करणसिंग यांनी केला. कुटुंब नियोजनात सक्ती करण्याविरुद्ध शासन आहे. या कार्यक्रमाविरुद्ध काही लोक जातीयवाद तयार करीत आहेत, अशांना त्यांनी इशारा दिला आहे.