महाराष्ट्रातील इतिहासकार, संशोधक, लेखक, पद्मभूषण गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात गोविल (रत्नागिरी जिल्हा) येथे 17 मे 1865 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथून जवळच असलेल्या शिपोशीत झाले.
माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगूताई कीर्तने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर वर्ष 1888 मधे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून ते बीए झाले. वर्ष 1889 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. त्यांना सयाजीरावांबरोबर परदेशाचा विशेषतः यूरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी त्यांच्याकडे अध्यापकीय कामाबरोबर ते हिशेबनीस म्हणूनही काम सोपविले होते. वर्ष 1925 मधे ते संस्थानी सेवेतून निवृत्त झाले. सयाजीरावांची कडक शिस्त व वक्तशीरपणा यामुळे त्यांच्यातही या गोष्टींचे अनुकरण ओघानेच आले. निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले. उर्वरित जीवन त्यांनी इतिहासाचा अभ्यास, लेखन, वाचन आणि संकलन यात व्यतीत केले. त्यांनी बडोद्यात असतानाच इतिहासलेखनास सुरुवात केली होती.
बडोद्याला सेवेत असताना सयाजीरावांना विविध विषय वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. त्यातून त्यांची इतिहासाची आवड व जिज्ञासा वाढत गेली.त्यांच्या या टिप्पणांनी पुढे त्यांच्या रियासतीचे लेखन सुरू झाले. वर्ष 1898 मध्ये त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली. याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा “द प्रिन्स’ व प्राध्यापक सिली यांचा “एक्सपान्शन ऑफ इंग्लंड’ या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. यानंतर इतिहास हेच त्यांचे जीवितकार्य ठरले आणि इ. स. 1000 पासून 1857 पर्यंतचा सुमारे 800 वर्षांच्या इतिहासाचे त्यांनी संकलन केले. त्यांनी त्याचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालक्रमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले. पॉप्युलर प्रकाशनाने स. मा. गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली आठ खंडांत मराठी रियासतीची नवी आवृत्ती प्रकाशित केली. याचा इतिहासकारांनी उपयोग करून घेतला.
रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक पुस्तके लिहिली. त्यामधे बालोपयोगी भारतवर्ष, महाराष्ट्राचा इतिहास, इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. त्यांची आणि इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्यात मैत्री होती. जदुनाथांनी सरदेसाईंना “सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार’ असे गौरवाने म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सुव्हेनिअर हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती पसरली.
ब्रिटिश शासनाने त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यांच्या अथक प्रयत्नाने पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे 45 खंड प्रसिद्ध झाले. सरदेसाई यांनी ज्ञानविस्तार, रत्नाकर, मनोरंजन, चित्रमयजगत, सह्याद्री, लोकशिक्षण इत्यादी नियतकालिकांतून सुमारे 275 लेख लिहिले. राजकारणात धर्म आणू नये व हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भर द्यावा, असा उपदेश केला आहे.
ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब व रावबहादूर हा किताब दिला. राजवाडे संशोधन मंदिराने (धुळे) “इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली. त्यांनी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांनी “माझी संसारयात्रा’ हे आत्मचरित्र लिहिले (1956). 29 नोव्हेंबर 1959 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.