न्यायालयीन यंत्रणेची संपूर्ण पुनर्रचना जरूरी
नवी दिल्ली, दि. 9 – 44वे घटना दुरुस्ती विधेयक हेतुपूर्ण व अर्थपूर्ण बनविण्यासाठी न्यायालयीन यंत्रणेची संपूर्ण पुनर्पाहणी व पुनर्रचना आवश्यक आहे, असे उद्गार कायदेमंत्री हरिभाऊ गोखले यांनी आज राज्यसभेत काढले.
आपली न्यायालयीन व्यवस्था ब्रिटिशांच्या धर्तीवर आधारलेली आहे. आपल्या जनतेच्या इच्छा आकांक्षाशी ती जुळणारी नाही. सृजनसिंग खटल्यापासून केशवानंद भारती खटल्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींपैकी बहुसंख्य जणांनी हे मान्य केले आहे की, संसद सर्वोच्च आहे.
कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणे मिटवावीत
अजनाला – देशाची सतत प्रगती व्हावी असे वाटत असेल तर कॉंग्रेस पक्षाची सरकारे व कॉंग्रेस नेत्यांनी आपापसातील भांडणे संपवावीत, असे संजय गांधी म्हणाले. तत्त्व मांडणारे व अंमलबजावणी करणारे अशा कॉंग्रेस पक्षाच्या दोन शाखांनी विरुद्ध दिशेने कार्य केल्यास देशाची प्रगती खुंटेल.
उच्च शिक्षणाची पुनर्रचना होणार
नवी दिल्ली – उच्च शिक्षणाची पुनर्रचना करण्याच्या प्रश्नावर विद्यापीठ अनुदान मंडळ गंभीरपणे विचार करीत आहे. उच्च शिक्षण समाजाशी संबंधित असले पाहिजे, असे मंडळाचे अध्यक्ष सतीश चंद्र म्हणाले.