-अरुण गोखले
घरातला छोटासा हळदी-कुंकू कार्यक्रम असो, नाहीतर मोठे लग्नकार्य, प्रत्येकासाठी पूर्वतयारी करावीच लागते. पूर्वतयारी केल्याशिवाय कार्य, काम हे व्यवस्थित होत नाही. मग चातुर्मास म्हटला, त्यातील व्रतवैकल्ये, पूजापाठ, सण, उत्सव म्हटले की त्यांच्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणे गरजेचे तर असणारच, नाही का?
अशा तयारीमध्ये चौरंग, समईच्या शोधापासून कहाण्यांच्या पुस्तकापर्यंत आणि पोथ्या शोधण्यापासून ते निमंत्रितांच्या याद्या करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आजही अनेक घरांमध्ये श्रावण सुरू झाला की लहानमोठा एखादा तरी ग्रंथ, ग्रंथाचे कथासार, छोटेखानी पोथ्या उदा., शिवलीलामृताचा अकरावा अध्याय, नवनाथ कथासार 40 अध्याय इत्यादी आवर्जून वाचन केले जाते.
या गोष्टी वेळच्यावेळी अन् जागेवर सापडल्या नाहीत तर सासू-सासरे, दीर-जावा यांच्या रागास, त्राग्यास, चिडचिडीस बिचाऱ्या सूनबाईला सामोरे जावे लागते. त्यामुळेच ह्या गोष्टी, वस्तू, पोथ्या ज्या काम झाल्यानंतर डाव्या-उजव्या हातांनी इकडे तिकडे ठेवल्या जातात, त्या या पूर्वतयारीत आधीच शोधून ठेवणे हे कौटुंबिक शांतता आणि समाधानाच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे असते.
श्रावणातला सत्यनारायण करायचा घाट घातला की आधी सामानाच्या यादीबरोबर सोवळे शोधून ठेवावे लागते. मुलीच्या मंगळागौरीची तयारी करताना गुरुजी, माहेरवाशिणी यांना आधीच बुक करावे लागते. तेव्हा कुठे असे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात. बरं! त्यात आणि मुलीच्या सासरच्या लोकांची विशेष खबरदारी, मानपान याकडे लक्ष द्यावे लागते ते वेगळेच.
गणपतीची आरास करायची म्हटली की यजमान, मुले यांची हे पाहिजे, ते पाहिजे अशी मागणी सुरू होते आणि मग घरच्या स्त्रीलाच हातातली इतर कामे बाजूला ठेवून त्या गोष्टी शोधून द्याव्या लागतात.
पुढे येणाऱ्या दसरा-दिवाळीची तयारी म्हटली, तर मग काय विचारूच नका. नवरात्रीच्या तयारीत तेलवातीपासून ते खण नारळाच्या ओटीपर्यंत आणि दिवाळीच्या तयारीत आकाशकंदिलाच्या वायर होल्डर, प्लगपिनपासून ते कपडे, फटाके, फराळाच्या पदार्थांच्या वस्तूंच्या खरेदीपर्यंतच्या सर्व गोष्टी आठवून, शोधून काढून नसल्यास मागवून घेऊन तयार ठेवाव्या लागतात.
एकूणच काय! तर या चातुर्मासाच्या उपवास, उपासना आणि उचित सादरीकरणासाठी सुद्धा बरीच पूर्वतयारी करावी लागते हे विसरून चालत नाही.