दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून मान्सूनचे भाकित करायला सुरुवात होते. मान्सून सर्वसाधारण असेल किंवा जास्त असेल अशा प्रकारच्या बातम्या हवामान खात्याकडून आणि काही खासगी संस्थांकडून सांगितल्या जातात. रखरखीत उन्हामुळे त्रासलेल्या सामान्य जनतेला या बातम्या जरी दिलासा देत असल्या तरी व्यक्त केलेले अंदाज नेहमीच खरे ठरतात, असे नाही. या वर्षीसुद्धा असेच झाले आहे.
मान्सून नेहमीपेक्षा खूप लवकर अंदमानात आणि केरळमध्ये दाखल झाला असला, तरी त्याची प्रगती म्हणावी तशी न झाल्यामुळे अद्यापही पावसाळी हंगामाला सुरुवात झालेली नाही. गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास पाहता 7 जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून पावसाच्या सरी बरसतात; पण यावेळी जून महिन्याचा पहिला आठवडा उजाडला तरी अद्यापही सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता कायम आहे आणि कोठेही पावसाळी हंगाम सुरू होण्याची लक्षणे दिसत नाहीत. अर्थात काही प्रदेशांमध्ये जरी मान्सूनपूर्व सरी बरसल्या असल्या, तरी त्याला पावसाळी हंगामाची सुरुवात झाली, असे म्हणता येत नाही.
नेहमीपेक्षा लवकर मान्सून अंदमानात दाखल झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात सर्वत्र मान्सून सुरू होईल, अशी आशादायक स्थिती निर्माण झाली होती; पण प्रत्यक्षात मान्सून दाखल होण्याची अशी शक्यता दिसत नाही. मे महिन्यामध्ये जेवढे कडक उन्हाळ्याचे वातावरण होते तेवढाच कडक उन्हाळा आता जूनच्या पहिल्या आठवड्यातही जाणवत आहे. हवामान संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे भारतातील मान्सून जर अशाप्रकारे लांबला तर पुढच्या कालावधीत उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पाणी टंचाई आणखी तीव्र जाणवणार आहे आणि शेतीची कामेसुद्धा लांबणार आहेत. गेल्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारे मान्सून काही काळ लांबल्यामुळे त्याचा बऱ्यापैकी फटका शेतीवर बसला होता. आतासुद्धा तसेच झाले तर परिस्थिती अवघड होणार आहे.
जागतिक परिस्थितीचा विशेषतः भारताचा विचार करता भारतामध्ये नेहमीच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. खूप वर्षांपासून प्रत्येक ऋतू चार महिन्यांचा अशा प्रकारे विभागणी करण्यात आली होती; पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसल्यामुळे हिवाळ्याचे प्रमाण कमी झाले आहे. चार महिन्यांचा हिवाळा दोन महिन्यांवर आला आहे आणि चार महिन्यांचा पाऊससुद्धा दोन ते अडीच महिन्यांवर आला आहे. साहजिकच आपल्या देशामध्ये जवळपास आठ महिन्यांचा उन्हाळी हंगाम दिसू लागला आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षांचा इतिहास बघता सर्व ऋतू अतिशय तीव्र स्वरूपात समोर येऊ लागले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू तीव्र स्वरूपात जाणवल्यानंतर पाऊस ज्या कालावधीत पडला त्याचे स्वरूपही तीव्र होते. हवामान खात्याच्या आकडेवारीसाठी पाऊस जरी आपली सरासरी गाठत असला तरी जेव्हा पाऊस पडायला पाहिजे तेव्हा तो पडत नसल्याने संपूर्ण गणितच बिघडून जाते.
एकेकाळी 7 जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून पाऊस हा हमखास हजेरी लावायचा; पण गेल्या काही वर्षांपासून पावसाचा हा मुहूर्त चुकत चालला आहे. हा मुहूर्त चुकत असला, तरी नंतर सरासरी भरून काढण्याच्या निमित्ताने जो प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्याने काय घडते याचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील कोकणामध्ये आणि कोल्हापूर, सांगलीमध्ये पावसाने जी दाणादाण उडवली होती आणि जनजीवन विस्कळीत केले होते त्याचे चटके अद्यापही तेथील जनतेला जाणवत आहेत. महापुराच्या तडाखातून अनेक कुटुंब अद्यापही सावरलेले नाहीत. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सरकारने संपूर्ण तयारी केली असली, तरी गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये जो पाऊस झाला तेव्हा पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पाणी साचले आणि प्रशासन पावसाळी हंगामाचे स्वागत करण्यासाठी अद्याप तयार नाही, हेच सिद्ध झाले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण मानले तर ज्या ठिकाणी पावसाचा फटका बसून महापुराचा धोका उद्भवतो त्या सर्व ठिकाणची परिस्थिती अशीच असू शकते.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येसुद्धा दरवर्षी प्रचंड पावसानंतर पाणी साचण्याचे आणि जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार घडतच असतात. ज्याप्रकारे मान्सूनच्या निश्चित आगमनाचे खरे भाकीत करणे अद्यापही हवामान खात्याला शक्य झालेले नाही त्याचप्रमाणे पावसाळी हंगामासाठी 100 टक्के तयार राहण्याचे काम अद्यापही प्रशासनाला जमलेले नाही, असाच निष्कर्ष काढावा लागतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाळी हंगामाची प्रतिक्षा फक्त बळीराजाला असते असे नाही, तर सर्वसामान्य नागरिकही चातकाप्रमाणे पावसाळी हंगामाची वाट पाहत असतो. कारण या एका पावसाळी हंगामामुळे पाणीटंचाई समस्येवर मात करता येते. हवामान खात्याचे अंदाज हे नेहमी चेष्टेचा विषय होत असतात.
खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरत होते; पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र पावसाळी हंगामाच्या सुरुवातीबाबत हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज चुकू लागले आहेत. पावसाळी हंगामाच्या काळातच काही चक्रीवादळे येत असल्यामुळे मान्सूनचा अंदाज चुकू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे मत असले, तरी या चक्रीवादळाचा अंदाज मात्र ते व्यवस्थितपणे व्यक्त करतात. त्यामुळे संभाव्य चक्रीवादळे लक्षात घेऊनच मान्सूनच्या हंगामाचे संभाव्य वेळापत्रक व्यक्त केले, तर ते योग्य ठरू शकते. जूनच्या पाहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होण्याची शक्यता आता पंधरा दिवस पुढे जाणार अशी लक्षणे दिसत आहे. रविवारी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हा “झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश दिला गेला. पावसाळी हंगाम लांबणे, या परिस्थितीला पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्षच कारणीभूत आहे. हवामान खात्याचा किंवा खासगी संस्थांचा अंदाज काही असो, पण लवकरात लवकर वरूण राजा प्रसन्न होवो आणि बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला दिलासा मिळो.