अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवर राममंदिर बांधकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आणि तेथे त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपच्या इलेक्शन अजेंड्यामधून राममंदिराचाच विषय बाजूला पडेल, असे वाटत असतानाच भाजपला अद्यापही आगामी काळात हा विषय वापरायचा आहे, असे संकेत मिळत आहेत.
राममंदिराच्या बांधकामासाठी देशात घरोघर जाऊन वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी हजारो स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, या मोहिमेमागे थेटपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप नाही असे जरी संबंधितांकडून सांगण्यात येत असले तरीही आगामी काळामध्ये राममंदिराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करण्याच्या निमित्ताने हा विषय जिवंत ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, हाच त्याचा अर्थ आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यातील हिंदुत्वावरील संघर्ष समोर आला आहे. राममंदिराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करण्याच्या मोहिमेची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये या मोहिमेवर जोरदार टीका झाली आणि भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले.
राममंदिराच्या बांधकामासाठी अयोध्या मंदिर न्यास समितीला देश-विदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळत असताना पुन्हा एकदा घरोघरी जाऊन अशा प्रकारे वर्गणी मागण्याची गरज काय, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावरून शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राम विरोधी आहेत अशी बोचरी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांशी आघाडी करून शिवसेनेने आपले हिंदुत्व बाजूला ठेवले आहे ही नेहमीची टीकाही आता भाजपकडून शिवसेनेवर केली जात आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शिवसेनेवर टीका करताना भाजपाने नेहमीच हेच धोरण ठेवले आहे. आमचे हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे असून ते सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करत असले तरीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचण्याचे काम भाजपचे नेते सतत करत असतात आणि राममंदिरासाठी वर्गणीच्या विषयावरून त्यांना पुन्हा एकदा हा मुद्दा मिळाला आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय फायदा होण्यासाठी राममंदिराचा मुद्दा जिवंत ठेवणे गरजेचे असल्याचे भाजपच्या लक्षात आल्यानेच भाजपाशी संबंधित संघटनांनी हे वर्गणी अभियान सुरू केले आहे. खरेतर राममंदिराच्या बांधकामाची जबाबदारी असणाऱ्या अयोध्या राममंदिर न्यास समितीच्या बॅंक खात्याचे सर्व डिटेल्स देश-विदेशात सर्व लोकांपर्यंत पोहोचले असून कोणीही थेटपणे या समितीला मंदिर बांधकामासाठी मदत करू शकते तरीही देशात सर्वत्र घरोघर जाऊन फूल ना फुलाची पाकळी तत्त्वावर वर्गणी गोळा करण्यामागे भाजपप्रणीत संघटनांचे ध्येय केवळ या विषयावर जनमत तयार करणे हेच आहे. यापूर्वी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा महाकाय पुतळा उभा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पोलाद गोळा करण्याची मोहीम अशाच प्रकारे राबविण्यात आली होती. राममंदिर बांधकामाचा विषय असल्याने सर्वसामान्य नागरिक या विषयाला विरोध करणार नाही आणि त्यानिमित्ताने आतापर्यंत जो समाज भाजपपासून दूर राहिलेला आहे त्या समाजालाही आपल्याजवळ आणण्याचे राजकीय धोरण या मोहिमेमध्ये असल्याचे सहज स्पष्ट होत आहे. या मोहिमेचा भाजपाला राजकीय लाभ होणार याची कल्पना असल्यानेच शिवसेनेला तो परिणाम पुसून टाकण्यासाठीच भाजपच्या या मोहिमेवर टीका करावी लागत आहे.
खरेतर राममंदिराच्या आंदोलनामध्ये शिवसेनेचाही सहभाग होता आणि 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या येथे बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर त्याची जबाबदारी घेणाऱ्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वप्रथम होते. त्याबद्दल त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला होता; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे कडवे हिंदुत्व विद्यमान शिवसेनेचे नेते विसरलेले आहेत हेच या निमित्ताने भाजपाला दाखवून द्यायचे आहे. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्या दौरा करून राम मंदिराला भेट दिली होती, त्यामागे आपले हिंदुत्व कायम आहे हे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता. राममंदिराच्या बांधकामासाठी शिवसेनेकडून एक कोटी रुपयांची देणगीचीही घोषणा करण्यात आली होती. या सर्व गोष्टी असल्या तरीही सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांसोबत असल्यानेच त्यांना भाजपाच्या या मोहिमेला विरोध करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही या मोहिमेला थेट विरोध करताना आम्हाला जर राममंदिराच्या बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते आम्ही थेट राममंदिर निर्माण समितीच्या खात्यामध्ये जमा करू, असे सांगत आहेत.
दुसरीकडे या मोहिमेशी भाजपचा काहीही संबंध नाही, या मोहिमेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा स्वयंसेवक सहभागी होऊ शकतो आणि घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करू शकतो अशी माहिती भाजपच्या नेत्यांकडून दिली जात आहे. या सर्व चर्चेवरून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे की भाजपाला पुन्हा एकदा राममंदिर हा विषय चर्चेत आणायचा आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून या विषयात ते यशस्वी झाले आहेत, असेही म्हणावे लागते. भाजपची कोणतीही मोहीम अतिशय विचारपूर्वक आखण्यात आलेली असते आणि या मोहिमेवर कोणती टीका होईल आणि कोणते वाद निर्माण होतील आणि त्या टीकेला किंवा वादाला कोणत्या प्रकारे उत्तर द्यायचे, याचे सर्व काही आधीच ठरलेले असते.
भाजपच्या नेत्यांनी विचारपूर्वक आखलेल्या या मोहिमेची माहिती इतर राजकीय पक्षांना नसल्यानेच ते भाजपच्या अशा प्रकारच्या मोहिमांच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि भाजपने निर्माण केलेल्या त्या विषयाला आपोआपच महत्त्व प्राप्त होते. यावेळीही तसेच झाले आहे. राममंदिराच्या जागेचा विषय आता संपला असला तरी त्या जागेवर राममंदिराचे बांधकाम करण्याचा विषय ताजा ठेवण्यात भाजपाला यश आले आहे, असेच म्हणावे लागते.