-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी
माणूस जगविण्यासाठी रोजगार आवश्यक आणि रोजगारासाठी उद्योग आवश्यक, या वर्तुळाचे डी-कोडिंग जगण्याच्या परिभाषेतच करायला हवे. कोविड काळाने ही संधी दिली आहे.
कोविडपश्चात जगाबाबत मध्यंतरी एका चर्चेत प्रश्न उपस्थित केला गेला, “उद्योग-व्यवसायासाठी कोविडपश्चात जगातील, “न्यू नॉर्मल’ नेमके कसे असेल,’ याचे एकाच वाक्यात पण मोठे रोचक आणि विचार करायला लावणारे उत्तर दिले गेले ते असे, आतापर्यंत उत्पादक, बाजारपेठेची पाहणी करून त्यानुसार उत्पादने तयार करत आणि मार्केटिंगच्या क्लृप्त्या वापरून ती बाजारात विकत. आता असे नसेल. बाजारपेठेची गरज विचारून त्याप्रमाणे उत्पादन तयार करणे, बाजारपेठेच्या गरजामधील बदलानुसार उत्पादनात सतत बदल करत राहणे आणि प्रसंगी बाजारपेठेलाच उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेणे, हे असेल न्यू नॉर्मल!’ या बदलात टिकायचे असेल, तर स्वतःला अद्ययावत करत राहणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
सध्याच्या संकटकाळात छोट्या संस्था आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची, आपल्या ग्राहकांची आणि आपल्या समाजाची काळजी कशी घेतात, याला महत्त्व असते. व्यवस्थापन तज्ज्ञांनी यावर व्यापक संशोधन केले आहे. त्यांचा केंद्रबिंदू होता यशस्वी संस्थांनी उद्योग पूर्ववत होण्यासाठी उचललेली पावले आणि जे कर्मचारी काम करत होते, त्यांना दिलेले प्रोत्साहन त्यातून त्यांनी जे निष्कर्ष काढले, ते व्यवस्थापन व कार्यपद्धतीतील बदल म्हणून स्वीकारले गेले आहेत.
संस्थेतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना निर्णय घेताना सहभागी करून घेणे, संस्थेतील काही व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या भावभावनांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यास सांगणे. कठीण आणि कसोटीच्या प्रसंगी प्रत्यक्ष प्रश्नांना हात घालणे, उद्योग पुन्हा सुरू होताना, व्यवस्थापनातील लोकांसकट सगळ्यांनी आपापले अनुभव मोकळेपणाने सांगणे. कर्मचाऱ्यांचे मनोबल अशा वेळी कमी होते, ते टिकवून आणि वाढवून व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी, नवनवीन योजनांचा विचार करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यशस्वी व्यवस्थापक अशा कसोटीच्या काळात कमीत कमी, पण अत्यंत कार्यक्षम, लवचिक आणि बहुआयामी कर्मचाऱ्यांच्या शोधात असतात. त्यांना काही जास्त अधिकार प्रदान करून कामाची गती वाढवता येते. जी कार्यपद्धती अवलंबिलेली असते, त्यातील त्रुटी संकट काळात प्रकर्षाने जाणवतात. मग त्या योजनेसंबंधी असतील, बिझनेस मॉडेलबद्दल असतील, कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेबाबत असतील, संस्थेतील संस्कृतीबाबत असतील किंवा ग्राहक संबंधांबाबत असतील, या अनेक गोष्टींचा पुनर्विचार केला पाहिजे.
यात एक अत्यंत अनमोल मुद्दा म्हणजे खर्चातील कपात; पण ज्या काही आपत्कालीन उपाययोजना संस्था करेल, त्या भविष्याचा वेध घेऊनच केल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात कोणते बिझनेस मॉडेल स्वीकारायचे आणि कुठे खर्चात कपात करता येईल हे बघणे आणि यासाठी तसेच भविष्याचा पुनर्विचार करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
करोना काळाने एकूणच जगण्याची परिमाणे बदलली आहेत. उद्योगातील भांडवल, पायाभूत सुविधा, रोजगार आदी मूलभूत बदलाबरोबरच उद्योगातील कार्यप्रणालीतही मोठे बदल घडवून आणलेत. लॉकडाऊनच्या काळात मनुष्यबळाला अधिकाधिक कार्यप्रवण करण्यासाठी; तसेच मनुष्यबळाच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही उपाययोजना करण्याकडे कंपन्यांचा कल राहिला. घरून काम करणे शिष्टसंमत झाले आहे. संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्रास सुरू आहे; परंतु काही वस्तूंचे उत्पादन करायचे असेल, तर काय करायचे? अशा परिस्थितीत काही लघु आणि मध्यम उद्योग, काहीही झाले तरी वाकणार नाही, हरणार नाही अशा सकारात्मक दृष्टीमुळे व नवीन उपक्रमामुळे सगळ्या संकटांवर मात करत आहेत. एका स्टील ट्रेडिंग कंपनीने टाळेबंदीतही, पूर्वी जी उद्दिष्टे पूर्ण करायची ठरविली होती, ती केवळ दोन महिन्यांत पूर्ण केली. हा चमत्कार एका रात्रीत घडला नाही. त्यासाठी त्यांनी भविष्याचा वेध घेत, नेहमीपेक्षा वेगळ्याप्रकारे विचार केला आणि त्याप्रमाणे नियोजन केले. या परिस्थितीत कोणते बिझिनेस मॉडेल योग्य ठरेल, याबद्दल पुनर्विचार झाला. जुन्या ग्राहकांना टिकविणे आणि नवीन ग्राहक शोधणे, यासाठीच्या निश्चित योजना ठरविल्या गेल्या.
दुसरी एक महत्त्वाची इंडस्ट्री आहे, पर्सनल व हाउसहोल्ड केअर इंडस्ट्री. करोना काळात याला विशेष महत्त्व आले आहे. हल्ली लोक पदोपदी हॅंड सॅनिटायझरचा वापर करू लागले आहेत. या उद्योगात नवे उपक्रम, नवी उत्पादने बाजारात आली. फॅब्रिक सॅनिटायझर, सरफेस डिसइंफेक्टन्ट, गॅझेट स्प्रे, व्हिजिटेबल वॉश ही काही उदाहरणे. ही उत्पादने अतिशय वेगाने आणली गेली. हळद, गुळवेलयुक्त साबणही येत आहेत. म्हणजे आता सौंदर्यापेक्षा, आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. आरोग्याचे, स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटले आहे.
लॉजीस्टिक्स या विषयातही क्रांती झाली. आजकाल सगळे घरपोच मिळते. एवढेच नव्हे, तर काही लोक गावातल्या गावात किंवा शहराच्या परिसरात ठराविक काळात पार्सल पोहचवितात. सध्याच्या कठीण काळात सकारात्मक दृष्टी ठेवून, पारंपरिक कामापेक्षा अधिक सुव्यवस्थित व सुनियोजित प्रयत्न करत एकमेकांना प्रोत्साहन देत, प्रत्येक क्षण नवीन शिकण्यात, ग्राहकांशी संवाद साधत, नवनवीन कल्पना अंमलात आणत, व्यक्तिकेंद्रित न राहता छोटेछोटे व्यक्तिसमूह निर्माण करून, त्यांच्याकडे अधिकार आणि जबाबदारी देऊन, सतत पुढे चालत राहणे हेच श्रेयस्कर ठरणार आहे. करोना काळातील या विधायक आणि नव्या दृष्टीने घडलेल्या घडामोडी पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त, तसेच उमेद वाढविणाऱ्या आहेत. संकट आले, तरी त्यावर मात करता येते, हेही यातून शिकता येईल.
करोना काळाने एकूणच जगण्याची परिमाणे बदलली आहेत आणि आपण कितीही आकड्यांच्या भाषेत बोललो, तरी उद्योग क्षेत्र जगण्यापासून वेगळे करता येत नाही; कारण अखेर ते मनुष्यबळाच्या मेहनतीच्या आणि मानवी ज्ञानाच्या पायावरच उभे असते.