मेलबर्न –सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर येत असल्याने येथीलच एका हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेला भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पूर्ण सुरक्षित व अत्यंत आनदी आणि समाधानी असल्याचा खुलासा बीसीसीआयने केला आहे.
रोहित भारतामधून जेव्हा ऑस्ट्रेलियाला जेव्हा रवाना झाला तेव्हा तो सिडनी येथे दाखल झाला होता. त्यानंतर रोहितला 14 दिवसांसाठी विलगीकरणात पाठवण्यात आले. तो सध्या सिडनीमध्येच एका हॉटेलमध्ये आहे. संघ व्यवस्थापन सातत्याने रोहितच्या संपर्कात आहे. तो विलगीकरणात तसेच बायोबबलमध्ये आहे. तो आपल्या रुममध्ये एकटाच आहे. तिथे जर काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि रोहितला जर सिडनीमधून बाहेर काढायचे असेल तर ते प्रयत्नदेखील करण्यात येतील, असा खुलासाही बीसीसीआयने केला आहे.
रोहित तिसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही तर रोहितला सिडनीमध्येच रहावे लागणार आहे.
अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितला स्नायू दुखावल्यामुळे दुखापतीचा सामना करावा लागला होती. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत होता. अखेर तो पूर्ण फिट ठरल्यामुळे त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झाली व त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवले गेले.