जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. आतापर्यंत आपण केवळ वातावरणाच्या बदलाचे समुद्राच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीच्या स्वरूपातील परिणामांवर जास्त लक्ष केंद्रित करून होतो. पण आता जगभरात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटा आणि त्यातून अनेक देशांमध्ये पेटलेल्या वणव्यांचे नवे भीषण वास्तव आपल्यापुढे आले आहे. यातून जगात नजीकच्या भविष्यात मोठा दुष्काळ पडण्याचाही धोका उद्भवला आहे. या साऱ्या भीषण संकटाला मानवाला सामोरे जायचे आहे.
अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई आतापासूनच जाणवायला लागली आहे. त्याविषयीचे अंदाज पर्यावरणतज्ज्ञांनी आधीच व्यक्त केले आहेत. आता उपाययोजनांनाही पुरेसा वेळ उरलेला नाही आणि आयत्यावेळी कितीही उपाययोजना हाती घेतल्या तरी त्याचा काही उपयोग होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. जगात सध्या ज्या उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत त्याचा फटका युरोप आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांना बसत आहे. या लाटांची वारंवारता, त्याचा कालावधी आणि तीव्रता इतकी भयाण होऊ लागली आहे की त्या विषयीची वर्णने वाचून आताच धास्तावायला झाले आहे.
ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानुसार आज जन्मलेल्या बालकाला तो 80 वर्षांचा होईपर्यंत प्रत्येक वर्षी 30 ते 50 उष्णतेच्या लाटा त्याला सोसाव्या लागणार आहेत. सध्या हे प्रमाण वर्षाला 4 ते 10 लाटांपर्यंत मर्यादित आहे. आताच ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये तापमान 4 अंश सेल्सिअसने वाढलेले दिसत आहे. युरोपात तर उष्णतेच्या लाटांमध्ये तापमान तब्बल 10 अंशांनी वाढलेले दिसले आहे. अमेरिकेत पुढील 20 वर्षात दर दहा वर्षांनी पाचपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या उष्णतेच्या लाटांचा आणि दुष्काळ निर्माण होण्याचा अगदी निकटचा संबंध असतो असे म्हणतात.
सूर्यापासून प्रसारित होणाऱ्या उष्णतेने जमिनीवरील आर्द्रता नाहीशी होते आणि जमिनी शुष्क पडत जातात. याचा जंगलात वणवे पेटण्याशीही अधिक जवळचा संबंध आहे. आज जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये जे भीषण वणवे पेटलेले आहेत हे याचेच प्राथमिक लक्षण आहे. सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात मोठा वणवा पेटला आहे. त्यात हजारो एकरावरील जंगल पूर्ण जळून खाक झाले आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी अशाच पद्धतीने अनेक प्रांतातील जंगल वणव्यांमध्ये नाहीसे झाले आहे. सन 2019-20 चा तेथील उन्हाळा म्हणूनच ब्लॅक समर म्हणून ओळखला गेला होता. उत्तर-पश्चिम अमेरिका, पूर्व रशिया आणि मध्य युरोप आगीच्या ज्वालामुखींवर उभे आहे. तेथे हे वणवे पेटण्याचे संकट कसले स्वरूप धारण करेल याचा अंदाज बांधणे मुश्किल होऊन बसले आहे. त्यामुळे तेथे वणव्यांची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा जागोजागी बसवली जात असून त्याच्या उपाययोजनांमध्ये व्याप्ती आणली जात आहे. या वणव्यांच्या आगीला काबूत आणून त्यातून होणारे नुकसान मर्यादित करणे शक्य आहे. पण तद्अनुषंगिक परिणाम म्हणून जगाच्या अनेक भूभागात निर्माण होणाऱ्या दुष्काळाच्या संकंटावर मात करणे मात्र मानवी प्रयत्नांच्या हातात राहणार नाही.
वातावरण बदलाच्या धोक्यांना नियंत्रणात आणायचे असेल तर ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करा, अशा वैज्ञानिक सूचना आपण सगळेच अनेक दिवस ऐकत आहोत. त्यावर अनेक जागतिक परिषदा, शिखर परिषदा वगैरे झाल्या आहेत. पण कार्बन उत्सर्जन कोणत्या देशांनी किती प्रमाणात करायचा हा तेथे वादाचा मुद्दा ठरतो. जगातल्या विकसित देशांनीच बेसुमार प्रमाणात कार्बन उत्सर्जन करून सध्याची पर्यावरणीय समस्या निर्माण करून ठेवली आहे, आत्ताशी आम्ही कोठे विकासाच्या मार्गावर जायला लागलो तर आमच्यावरच हे कार्बन उत्सर्जन नियंत्रणाचे झेंगट लावून आमच्या विकासाला आळा घालण्याचा श्रीमंत राष्ट्रांचा प्रयत्न आहे अशी ओरड विकसनशील राष्ट्रांकडून सुरू झाल्याने याविषयीच्या प्रयत्नांना मर्यादा येऊ पाहात आहेत. कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी आजवर अनेक करारमदार झाले. जाहीरनामे निघाले. शेवटी पॅरिस ऍग्रीमेंटवर हा विषय येऊन थांबला. जगातल्या देशांना वातावरण बदलाचे गांभीर्य कळले आहे असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जरा कोठे आशादायी चित्र निर्माण होऊ लागले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने ही सारी बंधने झुगारून देऊन ते पॅरिस करारातूनच बाहेर पडले होते. आता जर अमेरिकेसारखा देशच पर्यावरणाच्या बाबतीतील उपाययोजना करण्यास हात आखडता घेत असेल तर बाकी जगाने काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. जगाची बेसुमारपणे वाढत असलेली लोकसंख्या हेही जागतिक पर्यावरणापुढील मोठे आव्हान आहे.
आज जगाची लोकसंख्या आठशे कोटींच्या उंबरठ्यावर उभी आहे. इतक्या साऱ्या लोकांच्या अन्न, पाणी, आणि निवास याच्या व्यवस्थेत पर्यावरणाचे किती नुकसान होणार आहे याचेही अभ्यास स्वतंत्रपणे सुरू आहेत. आज पर्यावरणीय नुकसानीच्या अभ्यासाचे तंत्र बऱ्यापैकी विकसित झाले आहे. वैज्ञानिकही गांभीर्याने अभ्यास करून हे धोके जगापुढे सातत्याने मांडत असले तरी नुसते धोके लोकांपुढे मांडण्याचा काही उपयोग होतोय का याचाही आता वेगळा अभ्यास करायची गरज निर्माण झाली आहे.
मनुष्याने पर्यावरण ऱ्हासाचा धोका ओळखला आहे, पण त्याला अजून पुरेशी उपरती येत नाही ही खरी समस्या आहे. जेव्हा खायला अन्नच उपलब्ध होईनासे झाले की कदाचित मनुष्य भानावर येईल पण तोपर्यंत स्थिती आपल्या हातातून पूर्ण निसटलेली असेल तेव्हा आपण काय करणार आहोत याचाही विचार आता गरजेचा झाला आहे. वर उल्लेख केलेल्या उष्णतेच्या लाटा आणि वणवे भडकण्याच्या एकामागून एक पद्धतीने घडणाऱ्या घटनांची नीट जंत्री लावली तर मनुष्याला आजच भानावर येण्याची गरज आहे. आता विचार करायलाही वेळ उरलेला नाही. आता प्रत्यक्ष आणि प्रभावी उपाययोजनांकरून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे हाच एकमेव मार्ग मनुष्याच्या हातात आहे. त्या दिशेने जगाची वाटचाल सुरू झाली म्हणजे आपण आपल्या भावी पिढ्यांचे जरा तरी भले करू शकू.