काळ वेळ नाम उच्चारिता नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ।। रामकृष्णनाम सर्व दोषां हरण । जडजीवा तारण हरि एक ।।
हरिपाठातील एकविसाव्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाम घेण्यासाठी शुद्ध काळवेळेची जरुरी नाही, ते आपण हवे त्यावेळी घ्यावे. त्यायोगाने आपल्या आईचे कूळ व वडिलाचे कूळ अथवा नाम घेणारा व ऐकणारा या दोघांचाही उद्धार होतो.
सर्व पापांचा नाश करून जड जीवांना तारणारा एक हरिच आहे. हरिनाम हेच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे, त्याच्या दैवास कोणती उपमा द्यावी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरिचे चिंतन यथासंग झाले.
आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. सर्वच संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या नामजपाचे महत्त्व अगाध आहे. आपण बसता-उठता, दैनंदिन काम करताना नामजप करावा.