– विनय खरे
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सीमाभागांतील विविध 62 पुलांचे उद्घाटन करून एकाचवेळी राष्ट्रार्पण केले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाला समर्पित असा “रस्ते पूल पुष्पगुच्छ’ रस्ते संघटनेने देशाला दिल्याचे मानले जाते.
कोणत्याही राष्ट्राच्या विकासात्मक प्रगतीला संरक्षणदृष्ट्या मजबूत असणे हा मोठा आधार असतो. भारतीय भौगोलिक सीमांचा विचार करता उत्तर आणि पूर्वेकडील भूभाग हा जगातील विषम हवामान, बदलती भूस्तर रचना, जंगलपट्टा अशांनी समृद्ध असल्याने निरनिराळ्या संरक्षण दलांना नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. रसद पुरवठा हा सैन्याचा आत्मा असतो. त्यासाठी मनुष्यबळाची गरज असते आणि ती अवलंबून असते ती योग्य वाहन सामग्रीवर मग ते कारगिल, अरुणाचल प्रदेश, लडाख भाग कोणताही असेल.
स्वातंत्र्याची 75 वर्षे जवळ आली तरी बहुतांश सीमाभाग नेहमीच अशांतता अनुभवत असतो. साहजिकच नाही म्हटले तरी त्याचा फटका बसून प्रगतीला खीळ बसते. कारण, हजारो कोटी रुपये संरक्षण सिद्धतेवर खर्च करावे लागतात. देशाचा सागरीपट्टा शांत टापू असला तरी जगाचा मोठा व्यापार (80 टक्के) सागरी मार्गातून होत असल्याने भारतीय नौदल आणि तट रक्षक दलाला चुस्त राहात गस्त घालावी लागते. चीनची हिंद महासागरात चालू असलेली दादागिरी हेही एक कारण आहे. जमिनी सीमा बळकवणाऱ्या चीनने सागरातही अरेरावी सुरू केल्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान अशी अनेक राष्ट्रे सरसावली आहेत चीनला लगाम घालण्यासाठी.
गेल्या वर्षी चीनने गलवान भागात केलेल्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्य दलापुढील आव्हान वाढलं आहे. गलवान भागात चीनचे कंबरडे भारतीय सैन्याने आपल्या अतुलनीय पराक्रमाने मोडले असले, तरी ते मान्य करण्यास बराच काळ घेतला होता. आपलीही सैन्यहानी झाली. पाकिस्तानच्या नापाक कारवाया सतत चालू असल्याने त्यासाठीही खर्च होतच आहे. लष्कराच्या सुलभ गतिमान हालचालींसाठी, सामग्री ने-आण करण्यासाठी मजबूत रस्ते, मार्गावर छोटे पण महत्त्वाचे असलेले ब्रिज यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. दुर्गम भागात हवाई दलासाठी धावपट्ट्या आदी गोष्टी मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणाऱ्या ठरतात. गेल्याच आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या, पश्चिम किनारपट्टीवरील नौदलाच्या कारवार तळाची पाहणी करून प्रोजेक्ट सी बर्डचा आढावा घेत स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू विक्रांत जहाजाची प्रगती पाहिली. ती पुढील वर्षात चाचणीसाठी सिद्ध होईल.
सीमा रस्ते संघटनेकडून तयार केलेल्या विविध 62 पुलांचे उद्घाटन त्यांनी एकाचवेळी केले. मुख्य कार्यक्रम लेह लोमा रस्त्यावर बनवलेल्या 50 मीटर लांबीच्या पुलाचा होता. सध्याच्या बेली पुलाची जागा हा घेणार असून रणगाडे, तोफा यासह अन्य अवजड सामग्री वाहनांसाठी याची उपयुक्तता आहे. लेह लोमा रस्ता जो लेहला चुमथांग, हनले, त्सो मोरोरी झिल या स्थानांना जोडतो त्याचे महत्त्व पूर्व लडाखच्या सीमेलगतच्या भागात पोहोचण्यासाठी मोठे आहे. अन्य पुलांमध्ये लडाखमधील 11, जम्मू-काश्मीर 4, हिमाचल प्रदेश 3, उत्तराखंड 6, सिक्कीम 8, नागालॅंड-मणिपूर प्रत्येकी एक, अरुणाचल प्रदेश 29 अशा 62 पुलांचे एकाचवेळी राष्ट्रार्पण करण्यात आले.
या संपूर्ण पूल प्रकल्पांची एकूण किंमत 240 कोटी रुपये असून अत्यंत सीमेलगतच्या भागात ही जोडणी मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे ब्रिज सैन्य व्यूहरचनेच्या दृष्टीने आणि सैन्याची जलद वाहतूक यासाठी मोठा हातभार लावतील. यातून संरक्षण सिद्धता वाढण्यास मदत होईल. सीमा रस्ते संघटनेने आपला आधीचा 44 पुलांचा एकाचवेळी बांधणी करून राष्ट्र समर्पित करण्याचा विक्रम यावेळी मोडला. याआधी 17 जूनला 12 रस्त्यांचे उद्घाटन सिंह यांनी केले होते. यामुळे देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाला समर्पित असा “रस्ते पूल पुष्पगुच्छ’ रस्ते संघटनेने देशाला दिल्याचे मानले जाते.
करोना काळ असूनही दिवसरात्र एक करून सीमा परिसरातील दूरच्या गावांतून संपर्क प्रस्थापित करण्यासाठी कष्ट करणाऱ्या या रस्ते बांधणी संघटनेचे कौतुक राजनाथसिंह यांनी केले. यातील काही रस्ते दुर्गम भागातील गावांसाठी “जीवनरेखा’ बनतील, असं सांगत राष्ट्राच्या विकासात सीमा भागांत रस्त्याच्या जाळ्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने संकल्प सोडला आहे. रस्ते-पूल दळणवळणाचे साधन असून आर्थिक विकास, सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. लडाखच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केंद्रीय योजना गतीने राबवल्या जात आहेत. गलवान हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत सैन्य दले कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज आहेत. आत्मनिर्भर हा पुढील काळाचा मंत्र असून सर्वच बाबतीत यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
दीर्घकाळ प्रलंबित “वन रॅंक वन पेन्शन’ समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडगा काढला आहे. पुनर्वसनासाठी रोजगार मेळावे, माजी सैनिकांसाठी डिजिटल इंडिया मार्फत काही ऑनलाइन सुविधा, टेली मेडिसीनसाठी ई सेहत पोर्टल आदी बाबी सुरू केल्या आहेत.