– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ।।
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ।।
माऊली म्हणतात, इंद्रिये ज्याची इच्छा करतात, तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या अधीन होऊन जे विषय भोगतात ते ज्ञानाने आम्ही विषयसमुद्र पार झालो, मुक्त झालो असे त्यांना वाटले तरी ते खरोखर तरून जात नाहीत. तो केवळ त्यांचा भास असतो.
जशी नाव किनाऱ्याला पोहोचली असता वादळी वाऱ्याच्या अधीन झाली, तर अगोदर टळलेले संकट पुन्हा प्राप्त होते. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाने गमतीने जरी इंद्रियाचे लाड केले तरीसुद्धा तो पुन्हा सांसारिक दुःखाने पिळला जातो.
अर्थात, आपापल्या विषयाच्या ठिकाणी मुक्त संचार करणारी इंद्रिये आणि त्यांच्या मागे धावणारे चंचल मन, पाण्यातील नावेला भलतीकडे नेणाऱ्या वाऱ्याप्रमाणे पुरुषाच्या बुद्धीला भरकटत नेते.