पुढील वर्षी तेलंगणात विधानसभा निवडणुका असून, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपली शक्ती वाढवण्याचा निकराचा प्रयत्न करत आहे.
दोन वर्षांपूर्वी तेलंगणची राजधानी हैदराबाद महापालिका निवडणुकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. काही दिवासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणचा दौरा केला आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर तुफान हल्ला चढवला. देशात ठिकठिकाणी घराणेशाहीचे पेव फुटले असून, केसीआर यांचीही घराणेशाही आहे आणि यात परिवर्तन झाले, तरच देश व तेलंगण वाचू शकेल. मात्र, सध्या लोकशाही अर्थव्यवस्था ही परिवारवादाने घेरलेली आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
अलीकडे तेलंगणात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत भाजपला विजय मिळाला असून, 2020 च्या हैदराबाद महापालिका निवडणुकांत भाजपने उत्तम कामगिरी बजावली होती. टीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर हे कर्मकांडावर विश्वास ठेवणारे आहेत. तेलंगणचा उद्धार व्हायचा असेल, तर अंधश्रद्धाळू लोक तो करू शकणार नाहीत, अशी टीकाही मोदी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील धार्मिक असले, तरी त्यांचा विज्ञानावर विश्वास असल्याचा खास उल्लेख मोदी यांनी केला होता. केसीआर यांनी मध्यंतरी देशातील विविध राज्यांना भेटी देऊन आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. 2024च्या लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका निभावण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठीच त्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व आपण करावे, असे त्यांना कितीही वाटत असले, तरी ते शक्य नाही. कारण मुळात तेलंगण हे अत्यंत छोटेसे राज्य आहे. परंतु एकेकाळी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय स्तरावर किंगमेकरची भूमिका वठवल्यामुळे टीआरएस यांना प्रेरणा मिळाली असावी. काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी कर्नाटकात जाऊन माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेतली आणि लवकरच तुम्हाला “ग्रॅंड अलायन्स’ची खळबळजनक बातमी मिळेल, असे पत्रकारांना सांगितले. यापूर्वी पंतप्रधानांनी हैदराबादला संत रामानुजाचार्य यांच्या “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे अनावरण केले, त्यावेळी केसीआर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहण्याचे टाळले होते. तेलंगणात अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांनी प्रजासंगम यात्रा काढून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खूश होऊन, अमित शहा यांनी 2023 मध्ये भाजपच तेलंगणमध्ये सरकार स्थापन करेल, अशी गर्जना केली.तेलंगणात अँटि-इन्कम्बन्सीचे वातावरण असून, टीआरएस सरकारविरुद्ध तीव्र असंतोष आहे. संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तेथील निवडणुका लढण्याचा भाजपचा विचार असल्याचे सांगण्यात येते.
मे 2022 मध्येच हैदराबादेत टीआरएसचे खुले अधिवेशन भरले होते. त्यावेळी भाजपच्या केंद्रातील गैरकारभाराविरुद्ध केसीआर यांनी जबरदस्त टीका केली. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही केसीआर यांच्याशी चर्चा केली असून, राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याच्या दृष्टीने त्यांना कृतियोजना आखून दिली आहे. भाजपच्या धर्मांधतेविरुद्ध दोन हात करण्याची गरज असून, त्यासाठी पर्यायी राजकीय कार्यक्रम तयार करावा लागेल. एकात्मिक कृषी धोरण आणि औद्योगिक विकासाची निश्चित ध्येये ठरवून जनतेच्या आकांक्षा जागवता येतील. कोण पंतप्रधान, ही गोष्ट महत्त्वाची नाही, तर आपण लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद कसा देतो, हे महत्त्वाचे असल्याचे केसीआर यांचे मत आहे. मात्र, केसीआर यांच्याकडे करिश्मा नाही. शिवाय दक्षिणेतील नेतृत्व उत्तरेत चालत नाही. टीआरएसची सलग दोनवेळा सत्ता आली असून, आता तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
तेलंगण राष्ट्र समितीने दिलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. आम्ही जनतेला डबल बेडरूम घरे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन टीआरएसने दिले असले, तरी गजवेल, सिद्दीपेठ आणि सरसिला ही गावे वगळता, अशी घरे बांधण्यात आली नाहीत. ही गावे म्हणजे, अनुक्रमे केसीआर, त्यांचे पुतणे आणि अर्थमंत्री टी. हरीश राव व केसीआरपुत्र आणि आयटी मंत्री के. टी. रामाराव यांच्या मतदारसंघातीलच गावे आहेत. “मिशन भागीरथी’ या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरातील नळाला पाणीपुरवठा करण्यात येणार होता; परंतु तेही अपूर्णच आहे. शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा करण्याचे वचन हेही अर्धवट अवस्थेत आहे. राज्यात 2 नवे जिल्हे तयार करण्यात आले आहेत आणि त्यामुळे असंख्य प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या आहेत. तेलंगणातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाताची खरेदी केंद्र सरकारने करावी, अशी मागणी करण्यात आली; परंतु केंद्राला ती पूर्ण करणे शक्य नव्हते. तेव्हा, आम्हीच भात खरेदी करू, अशी घोषणा केसीआर सरकारने केली. परंतु या आश्वासनाची पूर्ती करणे सरकारला जड जात आहे.
तेलंगण सरकारने अनेक सवलतींची घोषणा केली असून, त्यामुळे वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाचे नियम बाजूला पडत आहेत. शेतकऱ्यांना गुंतवणूकसाह्य देण्यासाठी “रयतबंधू’ ही योजना असून, त्याकरिता 16 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलितांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अर्थसाह्य पुरवण्याची “दलितबंधू’ ही योजना असून, त्यासाठी दरवर्षी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासारख्या अनेक योजना या चांगल्या असल्या, तरी त्यासाठी पैसा आणणार कुठून?तेलंगण राज्याची स्थापना 2014 साली झाली असून, 8 वर्षांत राज्याच्या डोक्यावर 2 लाख 41 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
टीआरएस आणि एमआयएमचे संबंध जवळचे असून, त्यामुळे धर्मांधतेबद्दल बोलण्याचा केसीआर यांना कोणताही अधिकार नाही, अशी टीका भाजपतर्फे केली जात आहे. हैदराबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत भाजप आमदार टी. राजा सिंग यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यामुळे हिंदू-मुस्लीम प्रश्नावर तेलंगणमधील निवडणुका लढवल्या जातील, यात शंका नाही. असो. 28 मे रोजी हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्कार करणारे आरोपीही अल्पवयीन असून, ती राजकीय नेत्यांची मुले आहेत. त्यापैकी एक आरोपी हा टीआरएसच्या नेत्याचा व दुसरा एमआयएमच्या नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. या संतापजनक घटनेमुळे तेलंगण सरकारविरुद्धचा प्रक्षोभ वाढत चालला आहे. आगामी विधानसभा निवडणूक केसीआर यांना जड जाणार, असेच संकेत मिळत आहेत.