आरोप करणे, हा राजकारणातील प्रत्येक व्यक्तीचा जणू जन्मसिद्ध अधिकार असतो! आरोप, तेही खळबळजनक आरोप केल्याविना नेता प्रकाशात येत नाही. समाजात त्याची चर्चा होत नाही. ज्याच्यावर आरोप केले, त्याच्यावर ते चिकटले नाहीत अथवा ते निराधार ठरले, तरीदेखील कोणाची काहीही हरकत नसते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यासह अनेक सेलिब्रेटींची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा मृत्यू हा घातपात नसून, तो निव्वळ एक अपघात असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.
वास्तविक तिचा मृत्यू ही आत्महत्या नसून, तो खून होता आणि त्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता आणि या सर्व प्रकारात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध होता, असा सनसनाटी आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे चिरंजीव आमदार नितेश तसेच अन्य काही भाजप नेत्यांनी केला होता. भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदा घेऊन या प्रकारची चिखलफेक करण्यात आली होती. प्रत्यक्षात हे सर्व तथ्यहीन असल्याचे आढळले आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूच्या पाच दिवस अगोदर दिशाचा मृतदेह तिच्या इमारतीखाली आढळल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले.
तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाचच दिवसांत सुशांतचा मृत्यू झाल्यामुळे, या दोन घटनांत काही तरी संबंध असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सीबीआयने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, तेव्हा तिच्या मृत्यूमध्ये अधिकाऱ्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. तसेच या दोन घटनांत कोणतेही कनेक्शन असल्याचेही सापडले नाही. 8 जून 2020च्या मध्यरात्री दिशा आपल्या मालाडच्या घरी होती. घरी दिलेल्या पार्टीत तिने अतिरिक्त मद्यप्राशन केले होते. रात्री तिच्या चौदाव्या मजल्यावर असलेल्या घराच्या पॅरापेट वॉलवरून पाय घसरून ती खाली पडली. नशेतच तिचा तोल गेला व पडून तिचा मृत्यू झाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच त्यावेळी सुशांतचा मृत्यू नसून, तो खून असल्याचा आरोप भाजपकडून रोजच्या रोज केला जात होता आणि त्या प्रकरणातही आदित्य यांचे नाव घेतले जात होते. त्यामध्ये आदित्यचे नाव चर्चेत आणायचे नसते, तर सुशांत वा दिशाच्या मृत्यूशी भाजपला कसलेही देणेघेणे राहिले नसते. दिशाच्या पोस्टमॉर्टेम अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की, तिच्यावर ना बलात्कार झाला होता, ना ती गर्भवती होती. या संदर्भात गेल्या फेब्रुवारीत दिशाच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु त्याचे पुढे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. दिशाच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत, राणेंमुळे आमच्या मुलीची बदनामी होत असून, ती थांबवावी, असे आवाहन केले होते.
दिशावर कोणताही अत्याचार झाला नसून, ती गरोदरही नव्हती, हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालातही स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. खरे तर, मृत्युपश्चातदेखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे दिशाच्या आईवडिलांना किती मानसिक त्रास होत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. एवढेच नव्हे, तर समाजजमाध्यमांवरूनही बोगस अफवा पसरवल्या जात होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे, त्यांच्या श्रीमुखात लगावण्याची भाषा करणे आणि वर्षांनुवर्षे त्यांना शिव्यांची लाखोली वाहणे, हे राणे किती वर्षे करणार आहेत, कोणास ठाऊक. आपल्या पाठीत खंजीर खुपसून, ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, यामुळे खवळलेल्या भाजपने याप्रकारची आरोपांची राळ उडवण्यासाठीच राणे यांचा उपयोग करून घेण्याचा निर्धार केल्याचे दिसते. आता या प्रकरणात ज्यांनी आरोप केले, त्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी रास्त मागणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
खुद्द आदित्य यांनी याविषयी नापसंती व्यक्त करण्यापलीकडे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुशांत व दिशाबद्दल खोट्यानाट्या गोष्टी सांगून त्यात आदित्य यांचे नाव ओढले जात होते. “पेग, पार्टी आणि पेंग्विन’ या शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी आदित्य यांचा उद्धारही केला होता. शिवसेनेचा उल्लेख सातत्याने “पेंग्विन सेना’, असाही केला जात असतो. दोन-अडीच वर्षे हे सर्व सुरू असतानाही, आदित्य यांनी या विषयावर उत्तर न देता, आपले काम सुरू ठेवले. त्यांचे तरुण वय लक्षात घेता, यामुळे ते संतप्त झाले असते, तर ते समजू शकले असते. परंतु आपल्याला जाणीवपूर्वक उचकावले जात आहे आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊन एखाद्या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होणार आहे, याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे ठाकरे कुटुंबीय यासंबंधी शांतच राहिले. सुशांतच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेऊन, तो सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतरदेखील अद्याप त्यातून काहीही निघालेले नाही.
सुशांतच्या तपासाबाबत मुंबई पोलीस नालायक आहेत, असे चित्र भाजपचे नेते व प्रवक्त्यांनी निर्माण केले होते. त्यावेळी बिहार विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि सुशांत बिहारचा असल्यामुळे, या प्रकरणात बिहार पोलिसांचा राजकारणासाठी वापर करून घेण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील गाडीत स्फोटके ठेवण्यात आल्याच्या प्रकरणातही बोभाटा करण्यात आला. परंतु त्याच्याही तपासाचे निष्कर्ष अद्याप पुढे आलेले नाहीत. संजय राऊत यांच्या अटकेबाबत न्यायालयाने ईडीची अक्षरशः हजामत केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असूनही, त्यांना दुसऱ्या आरोपांच्या संदर्भात तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे हातोडा घेऊन शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांचे कथित अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी निघाले; परंतु हा हातोडा राणे यांच्या मुंबईतील “अधीश’ या अनधिकृत बांधकामावर चालवावा, असे त्यांना वाटले नाही. यावरून महाराष्ट्रात क्षुद्र राजकारण कसे खेळले जात आहे, हेच दिसून येत आहे. अर्थात सोमय्यांनी आरोप केल्यानंतर राऊत यांनीदेखील, उद्या ते माझ्या शेजारी जेलमध्ये असतील, असे म्हटले होते आणि त्यांच्यावरही आरोप केले होते. या आरोपबाजीमुळे, राज्याचे लक्ष मुख्य मुद्दट्यांवरून दुसरीकडे वळवले जाते. त्यामधून राज्याचे हित साधण्याऐवजी, चॅनेल्सचा टीआरपी वाढतो आणि जनतेचे केवळ विकृत मनोरंजन होते!