अनेक दशकांपासून मेहनत घेऊनही भाजपाला कर्नाटकाव्यतिरिक्त अन्य दक्षिण राज्यांत आपले पाय रोवता आलेले नाही. तमिळनाडूत लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपला अण्णाद्रमुकच्या मदतीने दक्षिणेत स्वार व्हायचे आहे.
दीड वर्षानंतर होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष कामाला लागले आहेत. कॉंग्रेस पक्षाने दक्षिणेतून भारत जोडो यात्रा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे विकासकामांच्या माध्यमांतून दक्षिणेत दौरे करत आहेत. असे असले तरी भाजपच्या रणनीतीकारांनी दक्षिण भारतावरून भाजप नेतृत्वाला चार गोष्टी सांगितल्या आहेत. दक्षिणेत मुसंडी मारायची असेल, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवायचे असेल तर पक्षांतर्गत सुधारणांचा वेग आणखी वाढवावा लागेल.
भाजप सध्या “ऑपरेशन दक्षिण विजय’साठी सज्ज आहे. भाजपचे लक्ष्य हे उत्तर आणि दक्षिण यांच्यातील दरी कमी करण्याचे आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप दक्षिणेकडे आणखी जोर लावू शकतो. संसदीय निवडणुकीच्या दोन वर्षे अगोदर भाजपने दक्षिण भारतात दोन लक्ष्य निश्चित केले आहेत. पहिले म्हणजे तमिळनाडू आणि दुसरे म्हणजे तेलंगण. दोन्ही राज्यांत प्रादेशिक पक्षांचे राज्य आहे. कर्नाटकच्या निवडणुका तर काही महिन्यांच्या अंतरावर आहे तर तेलंगणमध्ये एका वर्षाच्या आत निवडणूक होणार आहे.
भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिणेचा गड जिंकण्यासाठी स्वाऱ्या सुरू केल्या आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूचे आव्हान कायम राहिले. म्हणून द्रविड पक्षाचे वर्चस्व असतानाही भाजपने तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दक्षिणेकडील राज्यांत विविध कारणांमुळे भाजप अपयशी ठरली आहे. पहिले कारण म्हणजे द्रविड नेत्यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांच्याकडे दक्षिणेतील मोठा चेहरा नाही. दुसरे म्हणजे तमिळनाडूने पाच दशकांपेक्षा अधिक काळापासून स्वीकारलेली द्रविड विचारसरणी.
1967 मध्ये द्रमुकने राज्यावर ताबा मिळवल्यानंतर दक्षिणेकडील कॉंग्रेसचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून ते आजतागायत दोन प्रमुख द्रविड पक्ष द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांनीच तमिळनाडूतील सत्तेवर आलटूनपालटून ताबा मिळवला आहे. राज्यात भाजपच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचासरणीला कोणताही थारा नाही. अपयशाचे तिसरे कारण म्हणजे तमिळनाडूच्या शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदीला थोपविण्याला होणारा विरोध. चौथे म्हणजे तमिळनाडूत जातीय आघाडी तसेच सामाजिक न्यायासाठी कोणताही आधार दिसून येत नाही. या कारणांमुळेच कॉंग्रेस, भाजप आणि डावे पक्ष यासारख्या राष्ट्रीय पक्षांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या सहकार्याने राज्यात सत्तेत भागीदारी मिळवली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी पाहता भाजपने अलीकडेच मदुराई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी भाजपचे संमेलन बोलावून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात चेन्नईत दौरे करून राज्यात वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. मोदी आणि शहा यांनी राज्यात पूरक वातावरण तयार करण्यासाठी राजकीय हालचाली वाढविल्या आहेत.
अमित शहांनी चेन्नईत भाजपचे मुख्यालय “कमल लाया’ या ठिकाणी दीर्घकाळ बैठक घेतली. त्यानंतर निवडणूक रणनीतीवर चर्चा केली. सध्या भाजपकडून वेगवेगळे राजकीय डाव टाकले जात आहेत. तमिळनाडूतील दोन मातब्बर नेते एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भाजपकडून भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थात, स्टॅलिन सत्तेवर असून अण्णाद्रमुक पक्ष मात्र राजकीय संघर्ष आणि कायदेशीर बाबीत अडकला आहे. तसेच अण्णाद्रमुक गटबाजीतही अडकला आहे. पक्षाचे दोन गट माजी मंत्री ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यात पक्षाच्या नेतृत्वावरून कायदेशीर आणि राजकीय लढाई सुरू आहे. जयललिता यांच्यासमवेत तीन दशकांपासून अधिक काळ राहिलेल्या शशिकला यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. त्यांचा पुतण्या टी.टी.व्ही. दिनाकरण याने अगोदरच आपला पक्ष “ए.एम.एम.के’ची स्थापना केली आहे. या पक्षाने 2021 मध्ये निवडणूकही लढली. मात्र त्यांना पाच टक्केच मते मिळाली. या पक्षाला जनतेतून पाठिंबा मिळवण्यात अपयश आले. दुसरीकडे अण्णाद्रमुकची गटबाजी ही भाजपला फटका देऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकजूट होणे गरजेचे असल्याचे भाजपने अण्णाद्रमुकच्या नेत्यांना बजावले आहे.
अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखाली आघाडीत भाजप हा घटक पक्ष असेल. अशा वेळी तमिळनाडूतील सत्तारूढ स्टॅलिन सरकारच्या कामावर टीका करत भाजपकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जात आहे. करुणानिधी आणि जयललिता यांच्या मृत्यूनंतर दोन्ही द्रविड पक्षांचा मतांचा वाटा 30 टक्के राहिला आहे, तर भाजपच्या पारड्यात तीन टक्केच मते पडली आहेत. अण्णाद्रमुक हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्याच्याकडे राज्यातील लहान सहान पक्ष देखील आहेत. या पक्षाचे लक्ष्य पश्चिम आणि दक्षिण जिल्ह्यांवर आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 20 टक्के मते हवी आहेत आणि हे महत्त्वाकांक्षी ध्येय समोर ठेवूनच वाटचाल केली जात आहे. लोकसभेच्या किमान दहा जागा मिळाव्यात अशी भाजपला अपेक्षा आहे.
अर्थात, भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्यात जागावाटपावरून सकारात्मक चर्चा झालेली नाही. आता सर्व पक्षांसाठी दीड-दोन वर्षाचाच कालावधी राहिला आहे. ईपीएस गट हा भाजपला नाकारत अन्य लहान पक्षाबरोबर जाऊ इच्छित आहे. त्याचवेळी भाजप कॉंग्रेसला एकटे पाडत स्टॅलिनलाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. अशा बदलत्या समीकरणात आताच काही भाकित करणे अडचणीचे आहे. राजकारणात म्हटले जाते, की एक आठवडासुद्धा हा मोठा काळ असतो. आता तर तब्बल दीड-दोन वर्षाचा काळ बाकी आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राजकीय समीकरणे बदलू शकतात.