सरहद्द गांधी, खुदाई खिदमतगार, भारत-पाकिस्तान फाळणीचे कट्टर विरोधक भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांचा आज जन्मदिन. त्यांना बच्चा खान आणि बादशाह खान म्हणूनही ओळखले जायचे. ते पाकिस्तानातील सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी होते.
त्यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे 6 फेब्रुवारी 1890 रोजी झाला. त्यांचे पणजोबा अबेदुल्ला खान यांना पठाणी जमातींसाठी आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव केल्यामुळे फाशीची शिक्षा झाली. तसेच आजोबा सैफुल्ला खान हे देखील आयुष्यभर इंग्रजांविरुद्ध लढले. त्यांचे वडील बैराम खान मात्र शांत स्वभावाचे आणि ईश्वर भक्तीत लीन होते. अब्दुल गफार खान यांना स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू त्यांच्या आजोबांकडून मिळाले. वर्ष 1919 मध्येे पेशावरमध्ये मार्शल लॉ लागू झाला तेव्हा त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केले. तरीही त्यांना अटक करण्यात आली आणि खोट्या आरोपावरून सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्यांनी स्थापन केलेल्या खुदाई खिदमतगार (ईश्वराचे सेवक) या सामाजिक संस्थेच्या कार्याचे लवकरच राजकीय कार्यात रूपांतर झाले.
वर्ष 1930 मध्ये सत्याग्रहाचे नेतृत्व केल्यानंतर त्यांना पंजाबातील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे त्यांची पंजाबमधील इतर कैद्यांशी ओळख झाली. हिंदू-शीख-मुस्लीम ऐक्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांनी शीख गुरूंचे धर्मग्रंथ वाचले आणि तुरुंगात गीतेचा अभ्यास केला.हिंदू-मुस्लीम ऐक्य आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी गुजरातच्या तुरुंगात गीता आणि कुराण या विषयावर वर्ग आयोजित केले.
वर्ष 1930च्या उत्तरार्धात गफार खान महात्मा गांधींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक बनले आणि 1947 मध्ये भारताची फाळणी होईपर्यंत खुदाई खिदमतगार यांनी काँग्रेस पक्षाला सक्रियपणे पाठिंबा दिला. त्यांचे बंधू डॉ. खान साहेब हे देखील गांधींच्या जवळचे आणि काँग्रेस चळवळीचे सहयोगी झाले होते. वर्ष 1930च्या गांधी-आयर्विन करारानंतर अब्दुल गफार खान यांची सुटका झाली आणि त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली.वर्ष 1937 मधे प्रांतीय निवडणुकीत काँग्रेसला वायव्य सरहद्द प्रांताच्या प्रांतीय असेंब्लीत बहुमत मिळाले. खान साहेब निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले.
वर्ष 1942च्या ऑगस्टक्रांती आंदोलनात त्यांना अटक झाली आणि वर्ष 1947 मध्ये त्यांची सुटका झाली. देशाच्या फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला व तेथे पाकिस्तानमधील स्वायत्त पख्तुनिस्तानसाठी लढत राहिले. वर्ष 1988 मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना त्यांच्या पेशावर येथील घरात नजरकैदेत ठेवले. वर्ष 1985 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला त्यांची प्रमुख उपस्थिती होती. 20 जानेवारी 1988 रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांना जलालाबाद, अफगाणिस्तान येथे दफन करण्यात आले.