कादंबरी, नाटक, ललित, कथा, चित्रपटकथा लेखक, स्वामीकार म्हणून मराठी साहित्यक्षेत्रातील वाचकप्रिय लेखक पद्मश्री रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी कोल्हापूर येथे झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे रणजित देसाई यांचे मूळगाव. त्यांनी शालेय जीवनातच लेखनाला सुरुवात केली. त्यांचे इंटरपर्यंत शिक्षण झाले होते. कोल्हापूरच्या “महाद्वार’मधून त्यांनी आपले कथा लेखन सुरू केले. वर्ष 1947 मध्ये मॅट्रिकला असताना त्यांच्या प्रसाद मासिक आयोजित राज्यस्तरावरील कथास्पर्धेत “भैरव’ या त्यांच्या कथेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. या कथेनंतर वर्ष 1960च्या सुमारास जवळपास बारा वर्षांनी त्यांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली.
त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील खेडुतांच्या जीवनाचा चांगुलपणा तसेच सामाजिक वास्तवतेचे दर्शन होते. त्यांनी बारी, माझा गाव, समिधा यांसह चार सामाजिक कांदबऱ्या लिहिल्या. वर्ष 1962 मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी “स्वामी’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. अनेक आवृत्या निघाल्या.
“स्वामी’ ही मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी. “स्वामी’ वाचताना वाचकाला त्याकाळातील पेशवाईचे ऐश्वर्य, जीवन, कौटुंबिक कलह, माधवरावांची कर्तव्यकठोरता, राघोबाची कारस्थाने, माधवराव रमाबाई यांच्यातील प्रेमभाव, त्याग सर्वच गोष्टी समोर घडत आहेत, असे वाटते. पेशव्यांच्या निधनानंतर सतीचे सहगमनाचा प्रसंग काळजाचा ठाव घेणारा रेखाटला आहे. 1964 साली या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
छोट्या पडद्यावर वर्ष 1988 मधे या कादंबरीवर आधारित “स्वामी’ ही दूरचित्रवाणी मालिका प्रदर्शित झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी “श्रीमान योगी’ ही कांदबरी लिहिली. या कांदबरीला इतिहास अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या कांदबरीतून त्यांनी महाराजांचे जीवन आणि त्याचबरोबर स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम याविषयी बारकाईने वर्णन केले आहे.
रणजित देसाई यांनी सोळा कथासंग्रह, चार चित्रपटकथा, तेरा नाटके आणि सामाजिक, ऐतिहासिक विषयांवरील कादंबऱ्या लिहिल्या. रुपमहाल, कणव, जाण कातळ, गंधाली, कमोदिनी, आलेख, मधुमती, मोरपंखी सावल्या असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी गरुडझेप, रामशास्त्री, स्वरसम्राट तानसेन, हे बंध रेशमाचे, कांचनमृग, धन अपुरे, वारसा, स्वामी आदी नाटके तसेच नागीण, रंगल्या रात्री अशा, सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखनही केले. रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका. त्यांनी “नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
रणजित देसाई निसर्गप्रेमी होते. त्यांची अखेरची “शेकरा’ ही कादंबरी वाचकांना प्रत्यक्ष जंगलामधे घेऊन जाते. एका शेकरू (मोठी उडती खार) या रंगीत प्राण्यांच्या जीवनावर ही अनोखी कादंबरी आहे. या मधे हत्तीपासून मुंगीपर्यंत प्राण्यांचे भावविश्व रेखाटले आहे. अशा या थोर साहित्यिकाचे 6 मार्च 1992 रोजी निधन झाले.