-हिमांशू
महात्मा गांधी आज असते, तर त्यांनी कोणतं आंदोलन सर्वप्रथम हाती घेतलं असतं? असा प्रश्न विचारला तर खूप वेगवेगळी उत्तरं येतील. गांधीजी आज असते, तर त्यांना बरीच आंदोलनं करावी लागली असती, हे खरंही आहे. परंतु प्राधान्यक्रमानं त्यांनी कोणती मोहीम हाती घेतली असती, या प्रश्नाचं आम्हाला सापडलेलं उत्तर आहे- ट्रोलविरोधी मोहीम!
एखाद्याला किंवा एखादीला ट्रोल करताना भाषा अधिकाधिक टोकदार होत जाते आणि त्या प्रक्रियेचा दुष्परिणाम आपल्या एकंदर संस्कृतीवर होतो, हे तरं खरंच; परंतु सोशल मीडियावर बनावट नावांनी खाती काढून दिवसभर टिंगलटवाळ्या करणाऱ्या मंडळींना स्वतःच्या पलीकडे जग पाहायची सवयच उरलेली नाही, ही मुख्य समस्या आहे. असे लोक स्वतःकडेही वास्तववादी नजरेतून बघू शकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे ज्या परिस्थितीवर ही मंडळी रोज उठून शिवराळ भाषेत प्रतिक्रिया देतात, त्या परिस्थितीनं उद्या त्यांनाच गिळून टाकलं तरी पत्ता लागणार नाही, अशी त्यांची अवस्था!
सोशल मीडियाचं आभासी जग सुरुवातीला “साजिरं’ वाटलं खरं; पण ते एक कृष्णविवर आहे, हे आता लक्षात येऊ लागलंय. प्रत्येकजण आपापल्या तुटपुंज्या ज्ञानासह आणि अपुऱ्या अनुभवविश्वासह इथं अकलेचे तारे तोडतोय आणि स्वतःपलीकडे इतरांना ज्या भयाण वास्तवाला सामोरं जावं लागतं, त्याची अनुभूती घेण्याची निसर्गदत्त शक्तीच तो गमावत चाललाय.
थंडीनं कुडकुडणारे शेतकरी राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखोंच्या संख्येनं आंदोलन करत असताना ज्यांचा शेतीशी सुतराम संबंध नाही अशा तथाकथित सेलिब्रिटींनी जी अक्कल पाजळली, ती पाहून संवेदनशीलतेचा “दि एन्ड’ झालाय की काय, असाच प्रश्न पडला. शेतकऱ्यांच्या मागण्या वास्तव की अवास्तव हे मागाहून पाहता येईल; परंतु गोठवणाऱ्या थंडीत वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारले गेले, हे दृश्य पाहूनसुद्धा आपल्या अन्नदात्याबद्दल अंतःकरण हलत नाही, हे गंभीर नव्हे का?
एकीकडे लाखो लोक रस्त्यावर असताना दुसरीकडे काही मूठभरांसाठी ट्विटर म्हणजे बहात्तर रोगांवरचं औषध ठरलंय.
एखादं ट्विट केलं की आपली जबाबदारी संपली, असं मानणाऱ्या तारे-तारकांमध्ये जे ट्विटर वॉर रंगलं, ते पाहून त्या सर्वांनाच उचलावं आणि दोन दिवस-दोन रात्री खुल्या मैदानावर, बोचऱ्या थंडीत आणून बसवावं, असं वाटलं. ही मंडळी ट्विटरवरून चीन आणि पाकिस्तानला भिडतात, इथंपर्यंत ठीक आहे; पण आपल्याच देशातल्या आपल्यासारख्याच माणसांना दूषणं देत त्यांची गंमत पाहत राहतात, हा संवेदनशून्यतेचा कळसच! शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी ऊबदार खोलीत बसून एकमेकांशी भांडताना या मंडळींनी जे शब्द वापरले, ते पाहिल्यावर “आपणच यांना सेलिब्रिटी बनवलं’ याबद्दल आतीव पश्चात्ताप झाला.
अरे बिनबुडाच्या भांडखोरांनो, एकदा रानात कुळव चालवून बघा. करोना आणि लॉकडाऊनमुळे तुमचं काहीच गेलं नाहीये हो… आमच्या जिवावर तुम्ही बक्कळ कमावून बसलाय! मुंबईतल्या एका कर्णबधिर शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेला अर्धाच पगार मिळतो म्हणून ती भाजी विकू लागलीय. लाखो लोकांच्या घरातली आर्थिक गणितं सुटता सुटेनाशी झालीयेत. लोक पोटाला चिमटा घेऊन जगतायत. त्यांच्याच प्रेमातून आणि पैशांतून तुम्ही मोठे झालात, याचं भान ठेवा आणि किमान या संकटकाळात तरी नीट वागा!