पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट. एक ओळखीचा गृहस्थ बऱ्याच दिवसांनी घरी आला. हा पठ्ठ्या “शेंड्या लावणारा’ म्हणूनच प्रसिद्ध. नुकतंच त्याचं एक प्रकरण “कुणीतरी मिटवलं’ एवढीच माफक माहिती मिळाली होती. काही लोकांकडून त्यानं खोटं बोलून पैसे जमा केले होते आणि नंतर ते लोक त्याच्या मागं लागले होते.
बरेच दिवस तो तोंड लपवत फिरत होता आणि नंतर त्याच्यावर “ट्रीटमेन्ट’ सुरू असल्याचीही बातमी आली होती. घरी आल्यावर त्यानंच तो विषय काढला आणि आपल्याला डॉक्टरांनी “मागचं सगळं विसरण्याची’ इंजेक्शनं दिलीत, असं सांगितलं.
मग या पठ्ठ्याला आमचं घर कसं आठवलं? हा प्रश्न पडलाच आणि घरातल्या कुणीतरी त्याला तो विचारलाच. त्यावर त्यानं अजबच उत्तर दिलं. म्हणाला, “”त्या इंजेक्शनमुळे वाईट घटनाच विसरतात. आयुष्यात जे चांगलं घडलेलं असतं, ते लक्षात राहतं.” यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे, आम्हाला तो चांगलं समजत होता आणि दुसरी म्हणजे, वाईट गोष्टी विसरण्याची इंजेक्शनं मिळतात. म्हटलं, “”बाबा रे… ही इंजेक्शन्स कुठे मिळतात, सांगशील? मलाही मागचं बरंच काही विसरायचंय!” तात्पर्य, वाईट घटना विसरण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी चांगल्या घटना जास्त घडतील, असं वागावं लागतं. तरच या विचित्र काळात आपण थोडेफार तरी आनंदी राहू शकतो, असं म्हणता येईल.
माणसाचा मूळ स्वभाव वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याचा आणि चांगल्या गोष्टी विसरण्याचा आहे, ही विज्ञानदत्त माहिती. कॉम्प्युटरच्या आणि आपल्या मेमरीत हाच एक फरक असावा. कारण (अलीकडचं तंत्रज्ञान वगळता) कॉम्प्युटर चांगलं-वाईट असं वर्गीकरण न करता गोष्टी लक्षात ठेवतो. माणूस मात्र असं वर्गीकरण करतो आणि त्यासाठी मेंदूचा जो सूक्ष्म भाग वापरतो, त्याचा शोध शास्त्रज्ञांना आता लागलाय म्हणे! मेंदूतला केवळ एक रेणू हे काम करतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हाच असा बिंदू आहे, जिथं आठवणींचा संबंध भावनांशी जोडला जातो. उदाहरणार्थ, घरात पूर्वी बनवलेला कोणताही पदार्थ शिजत असला तर तो चांगला की वाईट, याची भावना हाच रेणू आठवणींशी जोडतो आणि पदार्थ नावडता असेल, तर आपलं तोंड पदार्थ चाखण्यापूर्वीच वाईट होतं. मेंदूत वाईट आठवणींची दाटी झाली की मानसिक आजार होतातच; पण सतत नकारात्मक गोष्टीच आठवत राहिल्या तरी ते होतात. मग चांगलंच आठवण्याची आणि वाईट विसरण्याची शक्ती निसर्गानं आपल्याला का नाही दिली? कदाचित, वाईट आठवणींमुळे आपल्याला चुकीच्या वर्तनाचे दुष्परिणाम आठवावेत आणि आपण वाईट गोष्टींपासून आणि कृत्यांपासून दूर राहावं, हीच निसर्गाची योजना असावी.
निसर्गाने आपलं काम केलं, असं म्हणून आपण त्याचे आभारच मानायला हवेत. पण मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढत असताना हे ताणतणाव येतात कुठून? या प्रश्नाचं उत्तर न शोधता आपण चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या वर्तनाचं समर्थन करायला शिकलो आहोत. शास्त्रज्ञांना मेंदूतला जो रेणू सापडलाय, त्याच्यावर नियंत्रण मिळवून “चांगलंच आठवेल’ अशी सोय करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न राहणारंय. बरंय! वाईटाची भीती तरी संपेल!