यापुढे कारखाने सातही दिवस चालू राहणार
भुवनेश्वर, दि. 24 – कटकशेजारी असलेल्या चौधवार औद्योगिक क्षेत्रातील सर्व कारखाने आठवड्यात सातही दिवस चालू ठेवण्यात येणार आहेत. इतके दिवस कामाचे 6 दिवस असत, एक दिवस सुट्टीचा असे. कामगार व मालकांनीच मजूरमंत्री वेणूधर यांना सूचना केली की, त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी 7 दिवस काम करण्यासाठी कारखाने चालू ठेवण्याची योजना आखावी.
इंजिन ड्रायव्हरांना अधिक तास काम नको
नवी दिल्ली – रेल्वे सुरक्षा खात्याचे कमिशनरांनी अशी शिफारस केली की, इंजिन चालविणारे ड्रायव्हर वगैरे नोकरांना त्यांच्या ठराविक कामाचे तासांपेक्षा अधिक वेळ काम कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे.
दूरचित्रवाणीद्वारा लोकशिक्षण
नवी दिल्ली – दूरचित्रवाणीचे सहाय्याने लोकशिक्षणाचे काम 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यासाठी 2400 सेटस वापरून लोकांना कुटुंबनियोजन, शेती, आरोग्य, शास्त्रीय ज्ञान याविषयी सहा राज्यांतील खेड्यांत कार्यक्रम दाखविले जातील. हिंदी महासागरावर अमेरिकेने सोडलेला उपग्रह भारतास एक वर्षभर कर्जाऊ म्हणून वापरू दिला जाईल. 35 हजार किमी अंतरावरून सदर कार्यक्रमाकरिता होणारे प्रक्षेपण उत्तम राहील व चित्रेही स्पष्ट व चांगली दिसतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारताकडे अणुबॉम्ब नाही
नवी दिल्ली – भारताजवळ अणुबॉम्ब वा तसा इतर कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही, असे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मेक्सिकन वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.