रशियन कम्युनिस्ट पक्षाचा संदेश
मॉस्को, दि. 28 – “भारतातील सर्व डाव्या आणि लोकशाहीवादी शक्तींना एकत्र आणण्याचे काम सध्या भारतीय कम्युनिस्ट पक्षापुढे आहे आणि ते सध्याच्या काळात अत्यंत निकडीचे व महत्त्वाचे आहे’, असे रशियन कम्युनिस्ट पक्षाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 10व्या अधिवेशनानिमित्त पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. “प्रतिगाम्यांची वाटचाल यशस्वीपणे थोपविण्यासाठी आणि प्रगतिपथावर भारताची आगेकूच होण्यासाठी या शक्तींचे एकत्रीकरण आवश्यक आहे’, असेही संदेशात
म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर विभागात समाविष्ट करा
रत्नागिरी – धान्य आवक वाढण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर विभागात समाविष्ट करावा, असा ठराव जिल्हा अन्नधान्य पुरवठा समितीच्या बैठकीत संमत झाला.
देशापुढे कठीण आव्हाने
नवी दिल्ली – देशापुढे सध्या सर्वात कठीण अशी आव्हाने असून काही व्यक्ती प्रगतीला मदत करण्याऐवजी केवळ वाईट गोष्टींकडेच लक्ष देत आहेत, याचा खेद वाटतो, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधींनी काढले.
वजन घटविणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा
नवी दिल्ली – वजन कमी करण्यासाठी जे प्रौढ लोक आहारावर नियंत्रण घालतात, त्यांच्या शरीरातील लोहतत्त्व कमी होण्याचा धोका असतो, असे आढळून आले आहे. जर्मन प्राध्यापक जॉर्ज स्लॉटर यांनी म्हटले आहे की, अशा नियंत्रित आहारात जरी वैविध्य आणले, तरीही लोहाचे प्रमाण अपुरेच राहते. अशा 20 ते 40 टक्के लोकांत लोहाची कमतरता आढळते.