चिखल… सहसा पावसाळ्यात दिसणारा, माती आणि पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा, बऱ्याच प्राण्यांना आवडणारा; पण मनुष्यप्राण्याला बेजार करणारा, चपलेला चिकटला तर वैताग आणणारा, घसरून पडल्यास कपडे खराब करणारा एक अद्भुत आणि ताकदवान पदार्थ! “ताकदवान’ हा शब्द इथं सहेतुक वापरलाय.
माती आणि पाणी एकत्र येऊन नैसर्गिकरीत्या प्रवाहित झाल्यास त्याच्या ताकदीचा अंदाज न घेतलेलाच बरा, असं बरेच तज्ज्ञ सांगतात. आपणही (म्हणजे आपल्यासारख्याच काही माणसांनी) त्याचा अनुभवही घेतलाय. काही वर्षांपूर्वी चिखलाने माळीण नावाच्या एका गावाचं अस्तित्वच पुसून टाकलं होतं. पावसाच्या थैमानामुळे गावकऱ्यांचा आवाजही कुणाला ऐकू आला नव्हता. कित्येकजण तर काही कळायच्या आतच ते गाडले गेले. शहरातले लोक त्या मानानं खूपच हुशार. त्यांनी चिखल तयार होईल, अशी जागाच कुठे शिल्लक ठेवलेली नाहीये.
सगळीकडे सिमेंट ओतून ठेवलंय. शहरातही पाणी भरतं, गटाराचं उघडं चेंबर दिसलं नाही म्हणून लोक वाहून जातात आणि समुद्रात सापडतात. फार तर खड्ड्यांमुळे लोक गळा काढतात, खड्ड्यात वृक्षारोपण वगैरे करतात. पण एकदा का पाऊस ओसरला, की चिखलाचा मागमूस दिसत नाही. अशाच शहरांमधून राज्यकारभार चालत असल्यामुळे उरलासुरला चिखल राज्यकर्ते आणि विरोधक परस्परांवर फेकण्यासाठी वापरून टाकतात. महाराष्ट्रात तर यंदा राजकीय भूकंप वगैरे घडून आल्यामुळे फेकाफेकीसाठी चिखल कमी पडला म्हणे!
इकडून दोघांच्या पत्रकार परिषदा, मग तिकडून कुणाचंतरी ट्विट, कुणाचीतरी मुलाखत, मग पुन्हा त्याच्यावरच्या कमेन्ट्स, मग कुणाचीतरी दिल्लीवारी, मग ती कितवी वारी याची आकडेवारी, कुणाचंतरी आव्हान, कुणाचंतरी प्रतिआव्हान, डिवचणं, चिडवणं, मोर्चे, प्रतिमोर्चे, जीभ घसरणं, आगपाखड, टोले-प्रतिटोले, दणके इत्यादी वगैरे! विचार करा, किती चिखल लागत असेल! अहो, अतिवृष्टी आणि पूरसुद्धा गायब करावा लागतो! पण दुर्दैवानं तो फक्त चर्चेतून गायब होतो. प्रत्यक्षात वर्षानुवर्षे ज्या गावांनी पक्के रस्ते बघितले नाहीत, त्या गावांची वाट अडवत असतो.
रस्त्यांवर चिखल नव्हे चिखलाचाच रस्ता होतो. त्यावरून आठ वर्षे वयाच्या एका मुलाला घेऊन त्याचा बाप दुचाकीवरून हॉस्पिटलकडे निघतो. पोटात दुखतंय म्हणून पोरगा रडत असतो. बापाच्या दुचाकीचं चाक चिखलात रुततं… तासभर प्रयत्न करूनही दुचाकी चिखलातून बाहेर निघत नाही आणि… बापाच्या डोळ्यासमोर पोराचा प्राण जातो… वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून! आठ वर्षे हे मरण्याचं वय आहे? पण ग्रामस्थांना नाइलाजानं या वास्तवावर विश्वास ठेवावा लागतो. हळूहळू
दुःखाची जागा संताप घेतो. “राज्यकर्त्यांनो लाज वाटू द्या,’ अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. ज्याचं एकदा नव्हे लागोपाठ दोनदा नामकरण झालं, त्याच जिल्ह्यातली ही घटना!
कोवळ्या पोराचे बळी घेणाऱ्या या चिखलाचं काय करायचं, हे चिखलफेक करणाऱ्यांनी आता एकदाचं ठरवून टाकावं! चिखलातूनच कमळ उगवतं (शंभर टक्के अराजकीय वाक्य) आणि त्याच कमळावर लक्ष्मी विराजमान होते (रिपीट, अराजकीय) हे सर्वांना ठाऊक आहे. चिखलाचं साम्राज्य पसरलेली कॉंक्रिटची शहरं आणि मातीची गावं या दोन्ही ठिकाणांवर लक्ष्मीची थोडीबहुत कृपादृष्टी झाली तरी ना खड्ड्यांमुळे जीव गमवायची वेळ येईल, ना ऐन धामधुमीत रथचक्र चिखलात रुतेल!