-दत्तात्रय आंबुलकर
तीन वर्षांपूर्वी महानगरी मुंबईपासून जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील फंगणे गावी एक आगळी-वेगळी शाळा सुरू झाली. या आगळ्या-वेगळ्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा वयोगट 60 ते 70 वर्षे असल्यानेच या शाळेला आजीबाईंची शाळा असे संबोधले जाते.
5 वर्षांपूर्वी फंगणे येथे शिक्षण आणि पाणीपुरवठा या समस्या होत्या. परिवर्तनासह बदलाचे वारे सुरू झाले ते 2013 मध्ये व निमित्त होते स्थानिक जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून योगेंद्र बांगर यांची बदली. 2013 मध्ये गावात एकमेव शौचालय होते. प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे शौचालय व पाणीपुरवठ्यात काहीही प्रगती होऊ शकली नाही. गावच्या महिलांची मोठी अडचण होत असे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना वर्षातील सहा महिने 3 किलोमीटर्सपर्यंत पायपीट करावी लागत असे.
गावकरी आणि महिलांची ही दुरवस्था पाहून त्यावर काही तोडगा काढावा असे शाळेचे मुख्याध्यापक योगेंद्र बांगर यांना प्रकर्षाने वाटले व त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधून त्यांना गावकऱ्यांसाठी काही करण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला त्वरित प्रतिसाद मिळाला. त्याचा मोठा फायदा महिलांना होऊ लागल्याने त्यांच्यात समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही बळावले.
यातूनच 2016 मध्ये फंगणे गावात सार्वजनिक शिवजयंती प्रसंगी शिवाजी महाराजांवरील व्याख्यान ऐकल्यावर गावातील वयस्कर पण अशिक्षित महिलांना शिवचरित्र वाचण्याची प्रेरणा झाली. त्यांच्या इच्छेला बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावात प्रौढ शिक्षणाचा विशेष प्रकल्प सुरू केला. या ज्येष्ठ व प्रौढ महिलांना मुळाक्षरे गिरविताना “अ-आई’च्या जोडीलाच “अ-आजी’ असे शिकविण्यात येऊ लागले व त्यामुळेच या ज्येष्ठ महिलांच्या शाळेला “आजीबाईंची शाळा’ असे मोठे साजेसे नाव देण्यात आले हे विशेष.
या महिलांना शाळेत येताना गणवेश पण ठरविण्यात आला. त्यानुसार महिलांना हिरवी साडी वा पातळ नेसून शाळेत येण्याचे निश्चित करण्यात आले. पण काही महिलांनी त्या विधवा असल्याने हिरवे कपडे घालण्याबद्दल त्यांच्या काही भावना लक्षात आणून दिल्यावर महिलांना गुलाबी रंगाची साडी-पातळ असा गणवेश देण्यात आला. अशाप्रकारे फंगणे गावच्या महिलांच्या शिक्षणाला चालना मिळत गेली.
या आजीबाईंच्या शाळेतील शिक्षिका म्हणून शीतल मोरे या उत्साहाने कार्यरत असून फंगणे गावातील त्या एकमेव शालांत परीक्षा उत्तीर्ण महिला आहेत. मात्र, शीतल यांना वयाने ज्येष्ठ महिलांना कसे आणि कशासाठी शिकवायचे याची पुरती कल्पना आहे. त्या आपल्या सासूबाईंच्या वयोगटातील या विद्यार्थिनींना त्यांच्या कलाने पण आपल्या पद्धतीनुसार शिकवित असतात व त्यांच्या या प्रयत्नातच फंगणे गावच्या आजीबाईंच्या शाळेच्या उपक्रमाचे खरे यश दडले आहे.