महाभयंकर अशा करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू झाल्याने भारतात लागू करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाउनला आता सात दिवस होत आले आहेत. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये भारतातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक हजाराच्यावर पोचली आहे तर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास ही संख्या 200ला येऊन ठेपली आहे.
जगातील अमेरिका, इटली, इराण, स्पेन या देशातील रुग्णांची आणि मृत्यूची संख्या पाहता भारतातील चित्र सध्यातरी आशादायक मानावे लागेल. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये योजनेत आलेल्या विविध उपायामुळेच हे शक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशभर लॉकडाउन जाहीर केल्यानंतर कोट्यवधी लोक गेले काही दिवस घरातच बसून आहेत. दररोज किमान आठ ते दहा तास काम करायची सवय असणाऱ्या लोकांसाठी हे घरबंदी त्रासदायक ठरत असली तरी भविष्यकाळाचा विचार करता हे संकट संधी म्हणूनच पाहावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये मानवाने विकासाच्या नावाखाली निसर्गावर अनन्वित अत्याचार केले. आता करोना विषाणूच्या निमित्ताने निसर्गानेच मानवाला शिस्त लावण्याचे मनावर घेतले असावे.
गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये भारतासह जगात सर्वत्र धोकादायक अशा हवा प्रदूषणामध्ये तब्बल 40 टक्के घट झाली आहे. ही गोष्ट या संदर्भात महत्त्वाची आहे. रस्त्यावरून वाहने जवळपास बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात इंधनाची बचतही झाली आहे. प्रदूषण करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या बंद असल्याने तेथेही राक्षसी चिमण्यांमधून होणारे प्रदूषण कमी झाले आहे. समाजात सर्वच ठिकाणी विविध प्रकारची अस्वच्छता करण्यास हातभार लावणारा माणूसच रस्त्यावर दिसत नसल्याने रस्तेही आता स्वच्छ दिसत आहे. घड्याळाच्या काट्याला आयुष्य बांधलेल्या सामान्य लोकांसाठी 24 तास घरात थांबून राहणे त्रासदायक ठरत असले तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा नातेसंबंधांना उजाळा देणे आणि स्वतःच्या छंदांना जोपासणे शक्य होणार आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून कौटुंबिक गाठीभेटी आणि वाचण्यासारखे छंद जपण्याच्या गोष्टी मानवापासून खूपच दूर गेल्या होत्या. 21 दिवसांच्या या बंदीच्या कालावधीमध्ये सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्मचा लोकांना संपर्क आणि आणि मनोरंजन म्हणून जरी आधार असला तरी वाचन, चित्रकला, गायन अशा विविध प्रकारचे छंद जोपासण्याची संधी निसर्गाने उपलब्ध करून दिली आहे हेही विसरून चालणार नाही. हातावर पोट असणाऱ्यांसाठीचा हा कालावधी खूपच कष्टदायक आणि त्रासदायक असला तरी सरकारने अशा लोकांची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे हेही विसरून चालणार नाही. सक्तीच्या बंदीच्या या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार थांबले असल्याने उत्पादन-विक्री हे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्याने अनेकांचे उत्पन्नच थांबले आहे. अर्थात, दुसऱ्या बाजूने पाहता लोकांच्या खर्चामध्येही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
आयुष्य नेहमीसारखे असताना आपण किती वायफळ खर्च करीत होतो. आता सर्वांच्या लक्षात आले असेल. साहजिकच मानवी आयुष्याला एक शिस्त लावण्याची संधी निसर्गाने निर्माण करून दिली आहे असेच याबाबत म्हणावे लागते. “जान है तो जहान है’ या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे विचार करता आज आपला जीव वाचला तर उद्या आपण काहीही करू शकतो हे लक्षात घेऊनच सध्याच्या संकटाचा मुकाबला करावा लागणार आहे. देशात संपूर्ण लॉकडाउन असूनही अद्यापही काही शहरांमध्ये रस्त्यावर नागरिक फिरत आहेत. बाजारपेठेत गर्दी करत आहेत. वाहतूक उपलब्ध नसल्याने रस्त्यावरून चालत जाऊन आपल्या गावी परत जाण्याचा निश्चय करीत आहेत. या गोष्टी थांबण्याची गरज आहे.
आगामी कालावधीत अधिकच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. इतर सर्व प्रगत देशांच्या तुलनेने भारताने या विषाणूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असल्याने भारत लवकरच या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो, असा एक संदेश मिळत आहे. पण त्यासाठी सरकारने नेमून दिलेल्या सर्व नियमांचे मनापासून पालन करण्याची गरज आहे. करोना विषाणू हे एक संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी लोकांसारखे उपाय योजले जात आहेत. त्यामुळे या उपायांना संकट न मानता संधी म्हणूनच त्याकडे पाहिले तर निश्चितच काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात. सरकारलाही या संकटाच्या गांर्भीयाची पूर्ण कल्पना असल्याने या संकटातून बाहेर पडल्यानंतर पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्याची तरतूदही आतापासूनच करण्यात येत आहे. पंतप्रधान मदत निधीला मोठ्या उद्योगपतींपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत ते पाहता किमान भारतीयांना तरी या संकटावर मात करणे फारसे अवघड जाणार नाही, असे वाटते. धोरणामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
नवीन उपचार योजना आणि संशोधनाला प्रारंभ झाला आहे. मुख्य म्हणजे भविष्यातील अशा कोणत्याही प्रकारच्या संकटाला तोंड देण्याची मानसिक तयारी आरोग्य यंत्रणेची झाली आहे. रेल्वेच्या डब्यापासून शाळेच्या खोल्यांपर्यंत सर्वत्र करोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष निर्माण करण्याची धडपड पाहता देशातील आरोग्य यंत्रणेला यासाठीही या संकटातून एक संधी निर्माण होत आहे. कधी नव्हे तो देशातील धर्मवाद, जातिवाद आणि संकुचित राजकारण थांबले आहे.
सर्वजण एकाच पातळीवर येऊन काम करत आहेत. आणखी असेच काही दिवस चालू राहिले तर आपोआपच समाजाला या एकजिनसीपणाची सवय होऊन जाईल. करोनासारख्या संकटाच्या निमित्ताने का होईना निसर्गाने तमाम मानवजातीला शिस्त लावण्याची मोहीम उघडली आहे, असेच म्हणावे लागते. त्याचा अर्थ आताच मानवाने समजून घेतला नाही तर भविष्यातील अशाच एखाद्या संकटाबाबत निसर्ग आपल्याला पुन्हा दुसरी संधी देणार नाही, हेही समजून घेण्याची गरज आहे.