तहसीलदार रूपाली सरनोबत ः आगामी नियोजनासाठी नीरा येथे बैठक
नीरा (वार्ताहर) -करोना (कोव्हिड 19) विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढण्याची शक्यता असल्याने दूरगामी प्रभाव होऊ शकतो. लॉक डाऊनच्या काळात रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्या मजुरांची उपासमारी होणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. हातावर पोट असणाऱ्यांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे गरजेचे होणार आहे. त्यासाठी आतापासूनच पुढील काळातील नियोजन करावे लागणार आहे, असे मत तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी व्यक्त केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठीच्या बैठकीत तहसीलदार रुपाली सरनोबत बोलत होत्या. यावेळी उपसरपंच विजय शिंदे, सदस्य अनिल चव्हाण, दीपक काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, मंडलाधिकारी संदिप चव्हाण, तलाठी संजय खोमणे, कोतवाल अप्पा लकडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, आरोग्यसेवक भाऊसाहेब चव्हाण, ऍड. पृथ्वीराज चव्हाण, हरीभाऊ जेधे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, हवालदार राजेंद्र भापकर, नीलेश जाधव आदी उपस्थित होते.
तहसीलदार सरनोबत म्हणाल्या की, तहसीलदार केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मुबलक रेशनिंग पुरवठा केला जाईल. ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही, अशांनाही धान्य पुरवठा करावा लागेल. सामाजिक संघटनांना, मंडळे, फाउंडेशन किंवा सीएसआर फंड या माध्यमातून गोरगरिबांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
व्यापाऱ्यांनी मानसिकता ठेवावी
नीरेच्या भाजी मंडईत एकाच ठिकाणी अनेक व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी बसतात. दररोज दिवसभर भरणाऱ्या मंडईत सकाळ, संध्याकाळ गर्दी होते. ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी व्यापाऱ्यांना वेळोवेळी सूचना करुनही त्यांची ऐकण्याची मनस्थिती नाही. अशी तक्रार करण्यात आल्याने या व्यापाऱ्यांना नीरेतील प्रभाग प्रमाणे किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी एक ते दोन व्यापारी किंवा शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बसण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना तहसीलदार सरनोबत यांनी दिल्या.