करोना काय आहे अन् काय करू शकतो, हे सगळ्यांना आता माहीत झाले आहे. श्रीमंतांनी आणलेल्या या आजाराकरता गरिबांना हजारो मैल पायपीट करावी लागते आहे. असे त्याचे दाहक वर्णन केले जात आहे. जगात व विशेषत: भारतात हे चित्र सगळीकडे दिसते आहे. आजारात जात-धर्म, श्रीमंत-गरीब असा भेदभाव नसतो. किमान करोना तरी तसे करत नाही. या आजाराने देशातील प्रांतांच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत. जागतिकीकरणाची ही देण असल्याचे मानले जातेय. त्याचे कारण पूर्वी आपला गाव, आपले घर एवढीच समज आणि जगाची ओळख होती. मानव समाज प्रगत होत गेला. त्याची भ्रमंती सुरू झाली. पुढे त्या भ्रमंतीला चाके आणि नंतरच्या टप्प्यात पंख जोडले गेले.
लोक विमानाद्वारे केव्हाच देशाच्या सीमा ओलांडून जाऊ लागले. त्यामुळे जगाच्या एखाद्या कोपऱ्यात काही घडले तर त्याची सगळ्यांनाच लागण होऊ लागली. साधनसामग्री जेव्हा मर्यादित होती, तेव्हा प्रश्न नव्हता. लोकांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारलेल्या नव्हत्या. त्यांना जे माहीत आहे किंवा जे दिसतेय तेच जग होते. जे माहितीच नाही, त्याची अपेक्षा नव्हती अन् त्यामुळेच ते मिळत नसल्याचे दु:खही नव्हते. तथापि, प्रगती झाली. मानव ग्लोबल झाला. जग हेच एक खेडे झाले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सगळे परस्परांशी जोडले गेले. कोणाच्या व्यथा आणि वेदना खासगी राहिल्या नाहीत. हे तंत्रज्ञानाचे, प्रगतीचे देणे. ते तापदायक असले तरी आजचे वास्तव आहे. मानवाला कधीतरी याचे मूल्य चुकवावेच लागणार होते. ती वेळ केव्हातरी येणारच होती. करोनाचे संकट हा तोच क्षण आहे. धावत्या माणसाला त्याने खिळवून ठेवले आहे. थोडी उसंत दिली आहे. काहीतरी विचार करण्यास भाग पाडले आहे.
मानवी आयुष्य महत्त्वाचे की ते जगण्यासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींचा जो पसारा त्याने मांडला आहे, ते प्राप्त करण्यासाठी केली जाणारी धडपड महत्त्वाची, हा लाखमोलाचा आणि किमान आजतरी कोणाकडेच उत्तर नसलेला प्रश्न करोनाने निर्माण केला आहे. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र त्यातही एकवाक्यता नाही. करोनापासून वाचायचे असेल तर स्वत:ला बंदिस्त करून घेण्याचा एक मार्ग आहे. पण त्याचवेळी कायमस्वरूपी तुम्ही स्वत:ला कोंडून घेऊ शकत नाहीत. कधीतरी ही बंधने झुगारावी लागतील. त्याकरता घराबाहेर पडणे महत्त्वाचे आहे. त्याकरता अर्थार्जन आवश्यक आहे व त्याकरताच थांबलेली चाके पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, ही दुसरी बाजू आहे.
आज आता जो कोलाहल चालला आहे, तो या दोन बाजूंच्या समर्थकांमध्येच चालला आहे. केवळ इतकेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातही एक द्वंद्व सुरू आहे. लॉकडाऊन हवे का नको? मानवी जीवन महत्त्वाचे की अर्थकारण या प्रश्नासाठी व त्याचे उत्तर मिळवण्यासाठी. जगात इतरही प्रगत देश आहेत. त्यांची श्रीमंतीच इतकी अफाट आहे की त्यांच्या पासंगलाही कदाचित भारतासारखी विकसनशिल राष्ट्रे पुरणार नाहीत. मात्र करोनाने त्या देशांनाही हतबल केले. त्यांच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आणि असंख्य लोकांचा बळी गेल्यावरही त्यांना लॉकडाऊन नको आहे. त्यांना अर्थव्यवस्थेचे रूतलेले चाक साद घालत आहे. यातील बहुतेक राष्ट्रे भारतातील एखाद्या राज्याइतकी लहान आहेत. मात्र तरीही ती जेरीस आली आहेत. लोकांचा रोजगार वाचवणे आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक उद्योगपतींनी तेच भाष्य केले आहे.
लोकांचे आरोग्य महत्त्वाचेच, मात्र अर्थकारणही महत्त्वाचे आहे. रोजगार नसेल तर घरात कोंडमारा सहन करणारी माणसे तग धरू शकत नाही. टीव्हीएस मोटर्सचे वेणू श्रीनिवासन यांच्यापासून इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उद्योजकांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याचे सूचविले आहे. एचडीएफसीचे दीपक पारेख आणि मारूती सुझुकीचे आर. सी. भार्गव यांचाही यात समावेश आहे. लॉकडाऊनला आज जवळपास 45 दिवस झाले आहेत. लाखो लोकांना पुन्हा गावाकडचा रस्ता धरावा लागला आहे. नोकरीची शाश्वती नाही. आहे त्यात पगाराची कपात आहे. भविष्यात बेरोजगारीचे संकट “आ’ वासून उभे आहे. घरातले प्रश्न वेगळे आहे. कुटुंबातल्या सदस्यांचे कोमेजलेले चेहरे आणि त्यावर असणारे प्रश्नचिन्ह त्यांना अस्वस्थ करते आहे. काय उत्तर द्यायचे हेही ठरवता न येण्यासारखी परिस्थिती. अनिश्चिततेच्या भोवऱ्यातच सगळे जग आणि त्यातील मानवजात अडकली आहे. कदाचित पहिल्यांदाच अशी स्थिती उद्भवली आहे. जेव्हा आपला निर्णय ठाम नसतो किंवा आपण चाचपडत असलो की आपण आसपासचा कानोसा घेतो. अमेरिकेतील इडलमन या कंपनीने तसा तो घेतला. माणसाचे आयुष्य महत्त्वाचे की अर्थकारण याभोवती जनमत घेण्यात आले.
अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, जपान, भारत आणि अन्य काही देशांतील लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्याचे निष्कर्ष मात्र बुचकळ्यात टाकणारे आहेत. माणसे मरतील मात्र अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे. आम्ही ती करणारच, असे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्पसारखे राज्यकर्ते म्हणत आहेत. उद्योजकांचाही तसाच मतप्रवाह आहे. असे असतानाही 67 टक्के लोकांनी आताच्या काळात लोकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. केवळ 33 टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेला प्राधान्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रप्रमुख आणि उद्योजक हे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी काय करणे गरजेचे आहे, त्या अनुशंगानेच आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र ज्यांच्यासाठी ते भूमिका घेत आहेत त्यांचा विचार सध्या तरी जीव वाचवण्याच्या बाजूने कौल देतो आहे. निर्णय घेणे सोपे जावे म्हणून राबवलेली प्रक्रियाच जर निर्णयाची वाट आणखी बिकट करणारी असेल तर सगळे मार्गच खुंटतात. वैद्यकीय पेशात बऱ्याचदा असे क्षण येतात. रुग्णाला वाचवण्यासाठी शल्यचिकित्सा करावी लागते. काहीवेळ शरीराचा एखादा भाग कापावाही लागतो. मात्र रूग्ण जगवणे महत्त्वाचे असते. आज संपूर्ण जगाला करोनाने रूग्णशय्येवर झोपवले आहे. त्यातून मानवी शरीर वाचवायचे आहे की अर्थव्यवस्था याचा निर्णय सरकारांना घ्यावा लागणार आहे. दोन्ही बाबी परस्परावलंबी आहेत. तसे असले तरी अगोदर माणूस जगला पाहिजे. गरजा अमर्याद असतात. एकदा माणूस जगला तर मर्यादित गरजांसह तो पुन्हा उभारी घेऊ शकतो. त्याकरता संघर्ष करू शकतो.