मुंबई : ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा (ईओडब्ल्यू) अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्विकारला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक असणारे ठाणे येथील आमदार प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ च्या चौकशी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दि. १४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एम. एस. बडे यांनी मूळ गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला. याचाच अर्थ पोलीस सदर गुन्ह्याचा तपास दफ्तरबंद करू शकतात. न्यायालयाने ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलएअंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशीधरन यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे. ईडीने शशीधरन यांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे. सरनाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत.
अमित चांदोले यांनीही न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याची व ईडीने मागितलेली रिमांड फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. तथापि, विशेष न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी चांदोले यांची न्यायालयीन कोठडी वाढविणे योग्य असल्याचे म्हणत पुढील सुनावणी दि. २१ सप्टेंबरला ठेवली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाने जानेवारीत टॉप्स समूह प्रकरणाचा तपास बंद करण्याची मागणी करणारा अहवाल सादर केला होता. या प्रकरणात कोणताही गुन्हा घडल्याचे आढळले नाही, असा दावा करून पोलिसांनी हा अहवाल सादर केला होता.