प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाने तब्बल 71 ठिकाणी रस्त्यावर तसेच सोसायट्या, घरांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. याची माहिती मिळताच महापालिकेकडून तातडीने संबंधित ठिकाणी यंत्रणा पाठवून पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
रविवारी झालेल्या पावसानंतर शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली असून, शहरात 35 आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यात, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर 25 कर्मचाऱ्यांची 15 पथके तर अग्निशमन दलाच्या 20 केंद्रांवरील प्रत्येकी 5 कर्मचाऱ्यांची 20 पथके पावसाचा अर्लट मिळताच तैनात ठेवण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पथकात अभियंता, आरोग्य निरिक्षक, उपअभियंता, बिगारी तसेच इतर कर्मचारी अशा 25 जणांचा समावेश असून, ही पथके 24 तास तैनात आहेत, असेही सोनुने यांनी सांगितले.
तलाव, नाल्यांवरही लक्ष
पालिका प्रशासनाने शहरातील पाषाण, जांभूळवाडी तसेच कात्रज तलावाच्या परिसरातही यंत्रणा तैनात केली असून, स्मार्ट सिटीकडून शहरातील नाल्यांवर बसविण्यात आलेल्या फ्लड सेंसरच्या आकडेवारीची माहिती संकलित करून त्याद्वारे क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या जात आहेत.
झाडपडीच्या 12 हून अधिक घटना
शहरात शुक्रवारी पावसामुळे बाराहून अधिक झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामुळे सकाळपासून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करत होते. सकाळी मुंढवा जॅकवेल पुलावरून पाणी वाहत असल्याने अग्निशमन दल दाखल होते. पोलिसांनी पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.
39 ठिकाणी राहण्याची सुविधा
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर शहरात नदीकाठच्या ज्या भागात पाणी घुसते, तसेच नाल्यांना पूर आल्याच्या घटना ज्या भागात यापूर्वी घडल्या आहेत, अशा परिसरात पुन्हा पाणी घुसल्यास या नागरिकांची 39 शाळांमध्ये राहण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तसेच गरजेनुसार जेवणाचीही सोय केली जाणार होती. मात्र, रात्री उशीरपर्यंत कोठेही नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले नसले तरी ही सुविधा पावसाचा अलर्ट अस पर्यंत कायम ठेवली जाणार आहे.