राहाता – तीस वर्षांच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगीण व भरीव विकास साधलेला आहे. यात कुठेही मी कमी पडलो नाही. भविष्यात रोजगारनिर्मितीबरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळवणे, निळवंडेचे पाणी उपलब्ध करून देणे व गोदावरी कालव्यांचे काम करणे हाच विकासाचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राहाता येथे झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ना. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिवराव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपचे निरीक्षक व समन्वयक रवी काका बोरावके, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे पाटील आदी उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले, तीस वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीत जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रस्थापित नेत्यांनी निवडणूक प्रचारात माझ्या विरोधात भूमिका घेतली. मात्र मतदारसंघातील मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवत मला सातत्याने मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. तुमच्या जोरावरच मी आज येथे उभा असून मतदारसंघाचा विकास साधलेला आहे.
खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, युती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात निळवंडे धरणाचे पाणी लवकरच येणार आहे. विरोधकांनी चुकीचे आरोप करण्यापेक्षा जनतेसमोर व्यासपीठावर येऊन बोलावे. या मतदारसंघात सर्वांगीण विकास साधला म्हणून तर ना. विखे पाटील यांना मतदार सातत्याने निवडून देत आहेत. विरोधकांना याठिकाणी आजही उमेदवार शोधण्याची वेळ येते, यावरून त्यांनी काय केले, हे जनतेला दिसून येत आहे. खा. लोखंडे म्हणाले यांनीही मनोगत व्यक्त केले.