– हिमांशू
काचेच्या बाटल्या, विजेचे बल्ब, ट्यूब वगैरे सामग्री कुटून त्यापासून मांजा तयार करताना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा धागा धारदार बनवण्यासाठी अशा प्रकारे काचेचा चुरा करताना अनेकांना जखमाही झाल्या असतील आणि अनेकांनी या कारणावरून घरच्यांचा मारही खाल्ला असेल. पण याच काचेच्या चुऱ्याचे मांजा बनवण्याव्यतिरिक्त अन्य उपयोग आहेत, हे तुम्हाला माहितीये का? लहानमोठ्या आकाराची खडी, डांबर याबरोबरच रस्ता तयार करताना त्या मिश्रणात काचेचा चुराही वापरला जातोय, हे दृश्य तुम्ही स्वप्नात तरी कधी बघितलंय का? अशा मिश्रणातून तयार केलेल्या रस्त्यावरून गाडी दामटताना ती पंक्चर होण्याची भीती तुम्हाला ठायीठायी जाणवेल, होय ना? पण घाबरू नका.
काचेचा चुरा रस्त्याच्या पृष्ठभागावर नव्हे तर आतील थरात वापरला जाणारंय. शिवाय, असे रस्ते आपल्या महाराष्ट्रात होणार नसून, महानगरी कोलकत्यात होणार आहेत. इतक्या काचा आणणार कुठून, वगैरे क्षुल्लक प्रश्न डोक्यात येऊ देऊ नका. त्याऐवजी असं भलतंसलतं करण्याची गरज का भासली, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या अपरिहार्यतेला कारणीभूत आहे आपला “मामा’… अहो, उंदीरमामा! या इवल्याशा जीवानं पोलिसांनी जप्त केलेली दारू फस्त केल्याची उदाहरणं आपण पाहिली, मुंबईसारख्या ठिकाणी तर जप्त केलेले ड्रग्जसुद्धा चाखले. हॉस्पिटलच्या खाटेवर झोपलेल्या रुग्णाचा अंगठाही कुरतडून पाहिला; पण एवढ्यावर उंदीरमामाचं समाधान झालेलं दिसत नाही.
कोलकत्यात उंदरांच्या टोळ्यांची सध्या अंडरवर्ल्डमधल्या टोळ्यांपेक्षा जास्त दहशत आहे. हे बिलंदर गडी चक्क रस्ते आणि पूल कुरतडायला लागलेत. फूटपाथवर बसवलेले पेवर ब्लॉक हां-हां म्हणता खिळखिळे होतायत. साठ ते पासष्ट टक्के रस्त्यांलगत उंदरांनी मोठमोठी बिळं केलीयेत आणि ते रस्ते कुरतडू लागलेत. पुलांचा थोडा-थोडा भाग रोज ढासळलेला दिसतो. स्थानिकांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, केक खावा तसे उंदीर पूल खातायंत. उंदरांचे दात जेसीबीच्या फाळासारखे आहेत की पूल केकपेक्षा मऊ आहे, हे मात्र समजू शकलेलं नाही. कोलकाता महापालिकेनं पिंजरे, सापळे, विषारी औषधं वगैरे सगळे उपाय करून बघितले. बिळं लिंपून बघितली; पण उंदरांची पैदास वाढतेच आहे आणि इमारतींजवळ जमीन उकरून पाया खिळखिळा करण्यापर्यंत त्यांची मजल गेलीये. माहीतगारांच्या म्हणण्यानुसार, शहरात रस्तोरस्ती खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत.
शिल्लक राहिलेले, वाया गेलेले खाद्यपदार्थ तिथेच टाकले जातात आणि त्यावर पोसूनच उंदरांची पैदास वाढत चाललीये. पालिकेनं अर्थातच या स्टॉलची फारशी दखल घेतलेली नाही. अखेर उपेक्षित उंदरांनाच पुढाकार घ्यावा लागला आणि विधानसभेत प्रवेश करून धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचावं लागलं. मग मात्र सगळेच हादरले. रोज-रोज आमदारांचा गदारोळ ऐकून कंटाळलेले विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, “विधानभवनात मी स्वतः उंदीर पाहिलेत. किंबहुना उंदीर हेच या सभागृहातील तटस्थ सदस्य आहेत. कारण सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता ते सगळ्यांना सारखाच त्रास देतात.’ अध्यक्षांच्या खोलीतले दस्तावेज उंदरांनी कुरतडलेत. महापालिकेच्या सर्वर रूममधल्या केबल आणि मशिनरी कुरतडलीये. थोडक्यात, मामांची फौज इतकी शक्तिशाली आहे की “युद्धजन्य परिस्थिती’ जाहीर करूनच हल्ला परतवावा लागेल. सर्वश्रेष्ठ मानवाला छोटे-छोटे जीव कसे ओलीस धरतात ना?