राज्यात 30 बाजार समितींचा समावेश
शिरूर- शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाची ई-नाम योजना फायदेशीर ठरत आहे. योजनेत पहिल्या टप्प्यातील 30 बाजार समित्यांमध्ये शिरुर बाजार समितीची निवड झाली आहे. ई-नाम योजनेत शेतकऱ्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक किंमत मिळणार आहे. वजन व विक्री झालेल्या मालाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. योजनेत इतर बाजारमधील नोंदणीकृत खरेदीदार बोली लावणार आहेत. त्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) ही केंद्र शासनाची शेतकऱ्यांसाठी योजना आहे. योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. ई-नाम योजनेच्या अनुषंगाने लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-ऍक्शन, शेतमालाचे वजन, सेल ऍग्रीमेंट, सेल बील, याप्रमाणे बाजार समितीचे कामकाज होत असते. ई-नाम योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी केले आहे.बाजार समितीने
मुख्य यार्ड शिरुर व उपबाजार आवारांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी केलेली आहे. यार्डवरच शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा. योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे शेतमालाचे पैसे ई-पेमेंटद्वारे बॅंक खात्यात जमा होत आहे. त्यासाठी यार्डवर शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅंक पासबुक व ओळखपत्राची झेरॉक्स घेऊनच यार्डवर यावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल वाळवून चाळणी करून विक्रीसाठी आणावा, असे बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी सांगितले.