सुरेश डुबल
कराड – विधानसभेच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते ते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीकडे. दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याची निवडणूक म्हणजे राजकीय पर्वणीच. येत्या सहा महिन्यात येथे राजकीय कुस्ती रंगणार असून मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही डॉ. सुरेश भोसले, अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. त्यामुळे या तिघांनी राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत.
जून-जुलै महिन्यात या कारखान्याची निवडणूक होत आहे. 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी स्वतःचे पॅनल टाकले. मात्र मोहिते राजकारणात नवखे असल्याने डॉ. सुरेश भोसले व डॉ. इंद्रजित मोहिते यांनी त्यांना दुर्लक्षित केले. त्यामुळे ही निवडणूक डॉ. सुरेश भोसले वर्सेस डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यामध्येच होईल असे चित्रही निर्माण केले गेले. मात्र निकाल हाती आला, तेव्हा चित्र वेगळेच होते. अविनाश मोहिते यांनी दोन्ही पॅनेलला धूळ चारून कारखाना हिसकावून घेतला. त्यानंतर 2010 ते 2015 या कार्यकाळात बऱ्याच घडामोडी घडल्या.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. या पुढील राजकारणात चव्हाण यांना शह देण्यासाठी उंडाळकर गटाने भोसले गटाशी जवळीक केली होती. अविनाश मोहिते यांना 2010 च्या कारखाना निवडणुकीत मदत करणारा उंडाळकर गट 2015 च्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्याबरोबर गेला, तसेच जयंत पाटील गट ही भोसलेंबरोबर असल्याने परिणामी कृष्णा कारखाना हा डॉ. सुरेश भोसले यांच्या ताब्यात गेला. कृष्णा कारखाना निवडणुकीनंतर झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भोसले-उंडाळकर गटास यश मिळाले.
त्यानंतर अल्पावधीतच मदनदादा मोहिते हे डॉ. इंद्रजित मोहितेंशी फारकत घेऊन डॉ. सुरेश भोसले यांच्या गोटात सामील झाल्याने मोहितेंना मोठा धक्का बसला. दीड-दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कराड दक्षिणेत तिरंगी लढत झाली. मात्र खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी ही लढाई होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दक्षिणमधील नेते अविनाश मोहिते यांनी उंडाळरांना सोडचिठ्ठी देत आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे काम केले. तर डॉ. इंद्रजित मोहिते हे अपेक्षेप्रमाणे पक्षाबरोबरच राहिले. त्यामुळे कृष्णा कारखान्याचे दोन माजी चेअरमन हे विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र आलेले पहावयास मिळाले. विधानसभा वेगळी अन् करखान्याची निवडणूक वेगळी, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नसल्यानेच तिन्ही पॅनल प्रमुखांनी आपल्या राजकीय हालचाली पूर्वीपेक्षा गतिमान केल्या आहेत.
उंडाळकर-जयंत पाटील गटाच्या भूमिकेकडे लक्ष
मागील निवडणुकीपेक्षा येणाऱ्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. मागील निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावलेला उंडाळकर गट व वाळव्यातील जयंत पाटील यांचा गट हा यावेळी कोणाच्या पाठीशी उभा राहणार? हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.